नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या महिला नेत्यांनी सोमवारी देशातील 21 शहरांत पत्रकार परिषदा घेतल्या. त्यामध्ये महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून मोदी सरकार आणि भाजपला घेरण्यात आले.
मोदी सरकारने मागील आठवड्यात संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले. त्यामध्ये महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. मात्र, त्या विधेयकाची अंमलबजावणी तातडीने होणार नाही. त्यावरून संबंधित विधेयक म्हणजे केवळ निवडणूक जुमला असून सरकारने विश्वासघात केला असल्याची टीका कॉंग्रेसकडून केली जात आहे.
आता त्या विधेयकावरून आणखी आक्रमक पवित्रा स्वीकारत कॉंग्रेसने महिला नेत्यांच्या पत्रकार परिषदा आयोजित केल्या. ज्येष्ठ नेत्या रजनी पाटील यांनी गुजरातच्या अहमदाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर 9 वर्षांनी भाजपने विधेयक आणले.
आगामी लोकसभा निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने ते पाऊल उचलण्यात आले. निवडणुकीत महिला कार्ड वापरण्यासाठी ती खेळी करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला. कॉंग्रेसच्या प्रवक्त्या महिमा सिंह यांनी गुवाहाटीत बोलताना मोदी सरकार आणि भाजपला लक्ष्य केले.
महिलांनी त्यांच्या हक्कांसाठी थांबावे; पण आता आम्हाला मतं द्यावीत असा भाजपचा अजेंडा असल्याचे त्या म्हणाल्या. महिला आरक्षण विधेयक आणण्याची कृती राजकीय हेतूने प्रेरित आहे, असा कॉंग्रेसच्या इतरही महिला नेत्यांच्या टीकेचा सूर होता.