बीड – परळी तालुक्यातील पांगरी गाव येथे असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याकडे 19 कोटी रुपयांची जीएसटी रक्कम थकली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे या कारखान्याच्या चेअरमन आहेत. दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी आयुक्तांनी कारखान्यास नोटीस जारी केली असल्याची माहिती समोर आली आहे. या नोटीसीबाबत पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, सांगितले गेलेले आकडे हे व्याजाबाबत असून कुठेही काहीही चुकीचं झालेले नाही. कारखाना तोट्यात असतानाही शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले आहेत. आर्थिक परिस्थीती आणि ऊसामुळे कारखाना चालला नाही. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, 8 ते 9 कारखान्यांनी दिल्लीत मदत मागितली होती. त्यात माझेही नाव होते. पण, मी सोडून बाकींना आर्थिक मदत झाली. मदत मिळाली असती तर हे प्रकार घडले नसते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
चुकीच्या पद्धतीने काहीही झालेले नाही –
पंकजा मुंडे म्हणाल्या, ही घटना दोन-तीन महिन्यांपूर्वीदेखील घडली होती. आताही झाली आहे. आमचा त्यांना अतिशय सकारात्मक प्रतिसाद आहे. तो उद्योग पूर्णपणे नुकसानीत आहे. आठ-दहा वर्षे सातत्याने दुष्काळ आल्यामुळे तो कारखाना लिक्विडेशनच्या परिस्थितीत आहे आणि बँकेकडे गहाण आहे. त्यामुळे हे सर्व फॅक्ट्स आहेत. जे आकडे सांगितले जात आहेत ते व्याजाचे आहेत. चुकीच्या पद्धतीने काहीच झालेलं नाही.
मी सोडून इतर सर्वांना मदत झाली –
कारखाना नुकसानीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे अदा केले आणि येणाऱ्या वर्षात कारखाना चाललाच नाही. दुष्काळ आणि आर्थिक परिस्थितीमुळे कारखाना चाललाच नाही. आठ-नऊ कारखाने दिल्लीत केंद्र सरकारकडे गेले होते. त्यातही माझे नाव होते. पण मी सोडून इतर सर्व जणांना मदत मंजूर झालीय. ती मदत झाली असती तर कदाचित या सगळ्या घटना घडल्या नसत्या. खरंच माझ्या कारखान्याची अडचण झाली नसती, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, युनियन बँकेकडून तब्बल 1200 कोटींचे कर्ज घेतले आहे. त्या कर्जाची परतफेड न करु शकल्याने यूनियन बँकेने या साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे. यूनियन बँकेने वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला सील केलेला असताना आता या कारखान्याचा जीएसटी कर बुडाल्याची माहिती समोर आली. जीएसटी विभागाने या प्रकरणी कारखान्याला नोटीस बजावली आहे.
दरम्यान, यावेळी भाजपमधून डावललं जातंय का? मदत का केली गेली नाही? असे प्रश्न पंकजा यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, याचे उत्तर मी देऊ शकणार नाही. मदतीच्या यंत्रणा देऊ शकतात. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा कारखाना आहे. ते ऊसतोड कामगारांचे प्रतिनिधी होते. त्यांनी खूप हालाखीत तो कारखाना उभा केला आणि मी खूप अडचणीत तो कारखाना सुरु ठेवला. तो आता बँकेकडे आहे.
बच्चू कडू यांची प्रतिक्रिया –
पंकजा मुंडे यांनी यात्रा काढली आणि त्या स्वतः महाराष्ट्रामध्ये फिरल्या, त्यामुळेच त्यांच्यावर कारवाई सुरू झाली असेल, असे मला वाटते. असं थेट वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. अमरावतीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडूंनी हे वक्तव्य केले.
एप्रिल महिन्यातही छापा –
केंद्रीय जीएसटी आयोगाच्या छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त कार्यालयाच्या पथकाने वैद्यनाथ कारखान्याला नोटिसा बजावल्या होत्या. पण या नोटिशींना प्रत्युत्तर न दिल्याने एप्रिल महिन्यात छापा टाकून काही कागदपत्रे हस्तगत केली होती. जीएसटी वेळेवर न भरल्याने ही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान आर्थिक देवाण – घेवाण आणि कागदपत्रांची तपासणी करण्यात आली होती.
वैद्यनाथ साखर कारखाना आर्थिक संकटात –
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी परळीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना स्थापन केला होता. या कारखान्याने कधीकाळी राज्यात सर्वाधिक ऊसाचं गाळप केल्याचं रेकॉर्ड आहे. याच कारखान्याच्या अंतर्गत गोपीनाथ मुंडे यांनी राज्यामध्ये अनेक कारखाने चालवायला घेतले होते. याच कारखान्यात तयार झालेली साखर कोरोनाच्या काळामध्ये व्यापाऱ्याला विकण्यात आली. मात्र त्याचा जीएसटी केंद्र सरकारकडे न भरल्याने जीएसटीचे अधिकारी थेट वैद्यनाथ कारखान्यात पोहोचले. जीएसटीचा नियम असा सांगतो की प्रत्येक महिन्याला जी साखर विक्री केली जाते. त्याचा जीएसटी महिन्याच्या महिन्याला जमा करावा. परंतु जीएसटी भरला नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या कारखान्यावर परळी तालुक्यातील अनेक लोक रोजगारासाठी अवलंबून आहेत. कारखाना बंद असल्यामुळे लोकांचे खुप नुकसान होत आहे.