नाशिक – नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी असोसिएशनने पुकारलेल्या बंद सामेवरीही सुरूच राहिल्याने आजही दिवसभर कांदा लिलाव ठप्प होते.
निर्यात शुल्क रद्द करण्याच्या मागणीवर व्यापारी ठाम असल्याने कोणताही तोडगा निघू शकला नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने त्यांनीही आक्रमक भूमिका घेत सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नाशिकमधील कांदा लिलाव बंदचा आज सहावा दिवस असून व्यापारी मागण्यांवर ठाम आहे. दुसरीकडे, नाशिकमधील शेतकरी संघटनांची आज लासलगावमध्ये एकत्रित बैठक पार पडली.
त्यानुसार येवला, चांदवड, निफाड, नांदगाव आदी तालुक्यातील शेतकऱ्यांना बैठकीला हजेरी लावली. यावेळी गेल्या सहा दिवसांपासून कांदा लिलाव ठप्प असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
शिवाय कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घामाचा भाव मिळाला पाहिजे, ज्या काही शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, त्या पूर्ण व्हायलाच पाहिजे, एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना सरकार काय करतय असा सवाल शेतकऱ्यांनी बैठकीत उपस्थित केला.
दरम्यान, उद्या व्यापारी व पणनमंत्र्यांच्या बैठकीत या मागण्या मान्य न झाल्यास थेट दिल्लीत ठिय्या मांडत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या बैठकीत राज्य व केंद्र सरकारला देण्यात आला.
या बैठकीपूर्वी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्यातील पदाधिकारी यांनी लासलगाव येथे दाखल होत बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
आज होणाऱ्या बैठकीवर लक्ष
पणन मंत्र्यांची उद्या मंगळवारी महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. यात नेमका काय निर्णय होतो याकडे आता लक्ष लागले आहे. या बैठकीत मागण्या मान्य झाल्यास कांदा व्यापारी लिलावात सहभागी होतील,
अन्यथा बेमुदत संप कायम ठेवणार असल्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे. दुसरीकडे आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांची बैठक पार पडली. त्यामुळे उद्याची बैठक कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.