मुंबई – अंधेरी पोटनिवडणुकमध्ये सुरू असलेल्या आखाड्यातून अखेर भाजपने माघार घेतली आहे. हा निर्णय म्हणजे खरतर भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
या निवडणुकीसाठी सुरू असलेले डावपेच ज्यामध्ये ऋतुजा रमेश लटके यांचा राजीनामा मंजूर न करणे, त्यांना नाईलाजाने कोर्टात जावे लागणे हा सर्व प्रकार अत्यंत क्लेषदायक व वेदनादायक होता. या सोबतच पक्षाचे चिन्ह गोठवणे, नाव गोठवणे हा प्रकारही या निवडणुकीसाठीच करण्यात आला, असेही ते म्हणाले.
पुढे प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, महाराष्ट्राची परंपरा ही यापेक्षा वेगळी आहे, ज्यामध्ये एखाद्या जागेसाठी काही दिवस शिल्लक असताना शक्यतो निवडणूक बिनविरोध होते. तसेच या निवडणुकीत भाजपाचा मोठा पराभव झाला असता, असा दावाही त्यांनी केला.
या निर्णयातून अनावश्यक गोष्टी टळल्या आहेत. ऋतुजा रमेश लटके यांना बिनविरोध निवडून आणण्याच्या निर्णयाचे जयंत पाटील यांनी मनापासून स्वागत केले.