नवी दिल्ली: कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी स्थलांतरित मजुरांच्या हालअपेष्टांवरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली. सरकार वगळता संपूर्ण देशाने स्थलांतरितांचा आक्रोश ऐकला. आता तरी लॉकडाऊनमुळे प्रभावित झालेल्यांसाठी सरकारी तिजोरी खोलण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
जनतेने आपल्या समस्या मांडाव्यात या उद्देशातून कॉंग्रेसने सोशल मीडियावरून स्पीक अप इंडिया ही मोहीम सुरू केली. त्याअंतर्गत सोनियांचा व्हिडीओ संदेश जारी करण्यात आला. लॉकडाऊनच्या काळात घरवापसीसाठी आतूर झालेल्या स्थलांतरितांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे हृदयद्रावक चित्र वारंवार पुढे येत आहे. त्याचा संदर्भ देऊन सोनिया म्हणाल्या, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच एवढे यातनादायी दृश्य पाहावयास मिळत आहे.
भूकेने आणि तहानेने व्याकूळ झालेल्या लाखों मजुरांना घर गाठण्यासाठी पायीच मोठे अंतर कापावे लागत आहे. त्यांच्यासाठी प्रवासाची आणि औषधांची उपलब्धता दिसत नाही. अनेकांच्या उपजीविकेची साधने हिरावली गेल्याने देशाला गंभीर आर्थिक पेचातून जावे लागत आहे. तसे असले तरी मोदी सरकारने गरजूंना मदत केलेली नाही, असा आरोप त्यांनी केला.
मोदी सरकारने पुढील सहा महिने प्रत्येक गरजू कुटूंबाला 7 हजार 500 रुपयांची आर्थिक मदत पुरवावी. स्थलातंरित मजुरांना तातडीने 10 हजार रुपये दिले जावेत. गावांमध्ये रोजगार वाढवण्यासाठी मनरेगाअंतर्गत कामाचे दिवस 200 पर्यंत वाढवावेत. छोट्या आणि मध्यम उद्योगांना कर्जाऐवजी आर्थिक दिलासा द्यावा, या मागण्यांचा पुनरुच्चारही सोनियांनी केला.