मुंबई – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना फोन केला. या दोघांमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कामाबद्दल आणि करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात चर्चा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी मुंबईतील करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर महत्त्वाची सूचनाही केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात मंगळवारी फोनवरून चर्चा झाली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही फोन करून संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय आणि करोनाबद्दल चर्चा झाली. राहुल गांधी यांनी करोनाचा प्रसार थांबवण्याबरोबर करण्यात येत असलेल्या इतर उपाययोजनांबद्दल आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
मुंबई महानगरातील लोकसंख्या खूप आहे. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. मात्र, आपण स्क्रिनिंग आणि टेस्टिंगचं प्रमाण वाढवायला हवे. महाराष्ट्र सरकार सध्या चांगलं काम करत आहे, असे राहुल गांधी आदित्य ठाकरे यांना म्हणाले.