कराड -शेतकऱ्यांची संस्था शेतकऱ्यांच्याच हातात रहावी, अशी आमच्या पॅनलची असलेली अपेक्षा आज सभासदांनीच पूर्ण केली. प्रत्येक पद आपल्याच घरात पाहिजे या विचाराला सभासदांची चपराक दिली असून अभद्र युतीला सूज्ञ सभासदांनी नाकारल्याचे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे, असे मत कॉंगेसचे नेते माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
कराड बाजार समितीच्या निवडणुकीत लोकनेते विलास काका पाटील रयत पॅनलच्या विजयाप्रित्यर्थ आभार व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी पॅनलचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर, उत्तरेतील नेते मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, मनोहर शिंदे, अजित पाटील-चिखलीकर, इंद्रजीत चव्हाण, गजानन आवळकर व विजयी उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार उपस्थित होते.
दरम्यान, कराड बाजार समितीच्या ऐतिहासिक विजयानंतर माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाले.
ऍड. उदयसिंह पाटील म्हणाले, कराड बाजार समिती निवडणुकीत सरंमजामशाही लोकांनी जनतेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच विलासकाकांच्या विचारानुसार समविचारी लोकांना बरोबर घेऊन आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत विरोधकांनी लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न केला, तर काही मतदारांना उचलून मतदान करण्यासाठी आणले असून त्यांना विचारांचे स्वातंत्र्य ठेवले नाही. सर्वसामान्य जनतेने या पुढील निवडणुकीत प्रस्थापित लोकांना थारा देऊ नये. रयत संघटनेने ही निवडणूक संघर्षातून, कष्टातून लढवली, त्याचाच हा विजय असल्याचे त्याही यावेळी सांगितले.
हा निकाल “उत्तरेसाठीचे’ उत्तर आहे
उत्तरमधील मतदार सूज्ञ असून त्यांनी या निवडणुकीत दिलेला उत्तरमधील आमदारांना चपराक आहे. यापुढेही आगामी निवडणुका एकत्रित लढवून निष्क्रिय आमदारांना घरी पाठविण्याचा निर्धार केला असल्याचे मत धैर्यशील कदम यांनी व्यक्त केले. बाजार समितीचा निकाल हा “कराड उत्तरसाठीचे उत्तर’ असून मतदारांनी भविष्यातही याच पद्धतीने निर्णय घेऊन उत्तरमध्ये परिवर्तन घडवावे, असे आवाहन रामकृष्ण वेताळ यांनी केले. तर बाजार समितीत मतदारांनी दिलेला कौल हा कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील परिवर्तनाची नांदी असल्याचे मत मनोज घोरपडे यांनी यावेळी व्यक्त केले.