मल्हारपेठ – पाटण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा निकाल व मतदारांचा कौल आम्हा सर्वांना मान्य आहे. बाजार समिती विस्तार, प्रगतीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून आपण सर्वांनी कठोर परिश्रम घेतले होते. या परिश्रमातूनच गेल्या पाच वर्षात दोन पेट्रोल पंप व मल्हारपेठ येथील भव्य गोडावूनचे काम पूर्ण झाले. ज्यांनी-ज्यांनी या विस्तारासाठी मदत केली, त्या सर्वांचे मी शेतकऱ्यांच्यावतीने आभार मानतो. या निवडणुकीत काही मोजक्या मतदारांनी आर्थिक लालसेपोटी गद्दारी केल्याने आपला अनपेक्षित पराभव झाला.
त्या गद्दारांना आपण भविष्यात नक्कीच धडा शिकवू. तसेच झालेल्या चुका व गाफीलपणा लक्षात घेऊन यापुढे पुन्हा नव्याने गट व पक्ष बांधण्यासाठी सर्वांनीच सज्ज व्हावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी केले. बाजार समिती निकालानंतर आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले, निवडणुकात जय-पराजय होत असतो. एकूण 4200 मतदारांपैकी काही मंडळींनी आर्थिक आमिषाला बळी पडून आपला स्वाभिमान गमावला असला, तरीही ही मंडळी अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच आहेत. परंतु, उर्वरित हजारो स्वाभिमानी मतदार आजही आपल्यासोबत एकनिष्ठेने खंबीरपणे उभे आहेत, हे सुध्दा आपण लक्षात ठेवले पाहिजे. परंतु, असे असले, तरी यात गद्दारी केलेल्या लोकांचीही दखल घेऊन यापुढे त्यांचाही योग्य तो विचार केला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ते म्हणाले, विरोधकांनी त्यांचा विजय कसा साजरा करायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु, पाटणमध्ये या मंडळींनी आपल्या वाड्यासमोर विजयाचा शड्डू ठोकला असला, तरी राजकारण, नैतिकता, संस्कार याचे त्यांनी भान राखले नाही. याबाबत जनसामान्यांमधूनच तीव्र संताप व्यक्त होत आहे. आपण आजपर्यंत कोणत्याही विजयाने हुरळून अथवा पराभवाने खचून गेलो नाही.
त्यामुळे बाजार समितीच्या विजयी कुस्तीमुळे त्यांनी हुरळून जाऊ नये. आपल्या सर्वांचे नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी, तर देसाई घराण्यातील त्यांच्या मातापित्यांसह दस्तूरखुद्द शंभूराज देसाई यांनाही अनेकदा पराभवाची धूळ चारली होती. मात्र, त्यावेळच्या विजयात दादांनी आपले राजकीय संस्कार, नैतिकता कधीही सोडली नव्हती. याच महाशयांचा यापूर्वी विधानसभेला तीन-तीन वेळा पराभव झाला आहे. यापुढेही अजून बऱ्याचश्या राजकीय कुस्त्या होणार आहेत. राजकारणामध्ये सत्ता येत-जात असते. त्यामुळे ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ याप्रमाणे आपल्या सर्व प्रामाणिक, स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळातील संघर्षासाठी तयार रहावे.
दरम्यान, आर्थिक लालसेला भुलणाऱ्या अशा गद्दारांचाही भविष्यकाळात योग्य तो समाचार घेतला जाईल. सर्वांनीच नव्या जोमाने सर्वांगीण विकासाच्या ध्येय-धोरणासाठी एकत्रितपणे आगामी लढाई लढूया. यात आपल्याला निश्चितच यश मिळेल, असा विश्वासही पाटणकर यांनी व्यक्त केला.