पुसेगाव -करोनाला रोखण्यासाठी सुुरू असणाऱ्या लॉकडाऊनमुळे शिक्षणक्षेत्रातील बदलासाठी ऑनलाईन शिक्षण शहरी विभागाबरोबरच ग्रामीण भागातही सुरू झाले आहे. परिणामी लॉकडाऊन हे शिक्षणक्षेत्रातील आमुलाग्र बदलांसाठी इष्टापत्ती ठरत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी घरात बसून मुलांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाबद्दल पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. ऑनलाईन शिक्षणाची संकल्पना ही प्रगत देशात प्रचलित असताना ती आपल्या देशात केव्हा पोहोचणार, आपल्या देशात हे शक्य आहे का, अशा शंका व्यक्त केल्या जात असत. अन्य देशांच्या तुलनेत आपल्या देशात कमी गतीचे इंटरनेट असल्याने तसेच या शिक्षणासाठी आवश्यक सुविधा आपल्याकडे नसल्याने ऑनलाईन शिक्षण स्वप्नवत असल्याचीच चर्चा सुरु होती.
चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील विवेकानंद ऍकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स या सीबीएसई शाळेने तीन एप्रिलपासूनच पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुविधा सुरु केली. सीबीएसई शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष नेहमीप्रमाणे एक एप्रिलपासून सुरु झाले. त्यामुळे या शाळेच्या प्राचार्या रुपाली शहा यांनी ऑनलाईन शिक्षण पध्दतीची संपूर्ण माहिती घेऊन काही दिवसांतच सर्व विद्यार्थ्यांकरीता सर्व विषयांसाठी कृतीशिल शिक्षणाची सुविधा उपलब्ध करुन दिली.
यामुळे घराच बसूनच विद्यार्थी शिक्षणाचा आनंद घेत आहेत. या सुविधेचे ग्रामीण भागातील पालकांनीही स्वागत करुन प्रतिसाद दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळणे शक्य झाले आहे. लॉकडाऊनमुळे अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. परीक्षांना स्थगिती देण्यात आली. एकंदरीत आपल्या मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होणार या विवंचनेत पालक होते. परंतु, स्मार्टफोनसाठी उपलब्ध झालेल्या “झूम’ अप्लिकेशनमुळे एकावेळी 200 विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे शक्य झाले आहे.
त्यामुळे उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांनी स्मार्टफोनचा उपयोग करुन विविध विषयांचे ऑनलाईन शिक्षण सुरु केले. ग्रामीण भागातील उच्च शिक्षण घेणाऱ्या परंतु सध्या आपल्या गावी असलेल्या या विद्यार्थ्यांकडून माहिती घेऊन या भागातील अनेक शाळांनीही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षणाचा कित्ता गिरवला आहे. ग्रामीण भागात अधूनमधून खंडीत होणारा वीजपुरवठा, इंटरनेटची कमी रेंज यामुळे दुर्गम भागातील ऑनलाईन शिक्षण सुविधेत अडथळे येत असले तरी लॉकडाऊनमुळे निर्माण जालेल्या प्रतिकूल परिस्थितीतही शैक्षणिक क्षेत्रात बदलाचे वारे वाहू लागले आहे.