फलटण -पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण गणपती लाड यांना वैचारिक वारसा आहे. शिक्षक मतदारसंघातील उमेदवार प्रा. जयंत दिनकर आसगावकर यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आहे. या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मतदान करुन सातारा जिल्ह्याचा वैचारिक वारसा जपा, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फलटण येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. गृह राज्यमंत्री सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. दीपक चव्हाण, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, अच्युतराव खलाटे, रणजितसिंह देशमुख, अजित पाटील-चिखलीकर, डॉ. सुरेश जाधव, ऍड.उदयसिंह पाटील, रणजित लाड, अमरदीप लाड, मनोहर शिंदे, कॉंग्रेसचे युवा नगरसेवक सचिन सूर्यवंशी-बेडके, महेंद्र सूर्यवंशी-बेडके उपस्थित होते.
ही निवडणूक महाविकास आघाडीने गांभीर्याने घेतली आहे. मतविभागणी टाळण्यासाठी आघाडीतील पक्ष एकत्र आले आहेत. या पाचही जागा आपण जिंकू असा विश्वास आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्त केला. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.