हेळगाव – कराड तालुक्यात काही गावांमध्ये सध्या हळद काढणी सुरू आहे. गतवर्षी अत्यल्प उत्पन्न मिळाल्याने शेतकरी वर्गातून नाराजी होत होती. अतिवृष्टीमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी हळदीचे पीक तारणार का? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
हेळगाव परिसरातील एकूण शेती क्षेत्राच्या किमान दहा ते पंधरा टक्के क्षेत्र हे हळद या पिकाची आहे. नऊ महिन्यांच्या कालावधी असणारे हे पीक जास्त उत्पन्न मिळवून देणारे म्हणून याकडे पाहिले जाते. गत तीन ते चार वर्षांतील परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना यातून मोठा फायदा झाला होता. अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले. त्यामुळे अनेकांचा या पिकाकडे ओढा वाढू लागला. उत्पन्नात दिवसेंदिवस होणारी वाढ व इतर कारणांमुळे हळदीच्या दरात घसरण होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
गेल्यावर्षी साधारण सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव हळदीस मिळाला होता. गतवर्षीच्या तुलनेने यावषी दरात वाढ होणार की दर स्थिर राहणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे अनेक पिकांचे नुकसान झाले. पर्यायाने शेतकऱ्यांचेही नुकसान झाले. मात्र ही अतिवृष्टी हळद पिकासाठी फायदेशीर ठरली आहे. उत्पन्न चांगल्या प्रतिचे निघून त्यास दरही चांगला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
सध्या शेतात हळद काढण्याची लगबग सुरू झाली आहे. हळद खांदने, मोडणे, साफ करणे, शिजवणे आणि शेवटी वाळवणे अशी मोठी प्रक्रिया करावी लागत असल्याने मजूर यांच्याशिवाय ही कामे करणे अशक्य आहे. मजुरांच्या हजेरी दरातही वाढ झाल्याने या पिकास किमान दहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तरच शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. अन्यथा शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. येत्या दोन दिवसात सौदे होणार असल्याने याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.