अफवा असल्याचे सत्ताधारी-विरोधकांचे म्हणणे : लढत होणार की नाही हे सोमवारी होणार स्पष्ट
बारामती – माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून “रण’ तापले असून अवघ्या तीन आठवड्यांवर निवडणूक आल्याने सत्ताधारी व विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी “रणा’गणात “भडका’ उडला आहे. त्यातच हे “रण’ बिनविरोध होणार या वावड्या कार्यक्षेत्रात उठल्या असल्याने सभासद संभ्रमात पडले असून सत्ताधाऱ्यासह विरोधकांनी हा बिनविरोधचा दावा खोडून काढला असला तरी राजकीय दिशा आणि दशा कधीपण आणि कशीही फिरते हे जनता जाणून असल्याने शेवटच्या क्षणापर्यंत तरी अंदाज लावणे कठीण आहे.
सत्ताधाऱ्यासाह विरोधकांची सावध भूमिका
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनल आणि सत्ताधारी सहकार बचाव शेतकरी पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची यादी पक्षश्रेष्ठींनी अद्याप गुलदस्त्यातच ठेवली आहे. या निवडणुकीत 21 जागांसाठी तब्बल 299 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अर्थात उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवारपर्यंत (दि.10) असल्याचे दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनी सध्यातरी सावध पवित्रा घेतल्याचे दिसते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्यातील बारामती तालुक्यातील माळेगाव सहाकारी कारखान्यावर भाजपचे वर्चस्व आहे. ही सल राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये कायम असून यंदा काही करून कारखाना पुन्हा ताब्यात मिळवण्याच्या इराद्याने व प्रतिष्ठेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने आकाश-पाताळ एक केले आहे. तर भाजपच्या गुरू-शिष्याच्या जोडीनेही कारखाना विरोधकांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी कंबर कसली आहे.
माळेगाव कारखान्याच्या 21 संचालकांच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे सहकार बचाव शेतकरी पॅनल तर विरोधकांचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत नीलकंठेश्वर पॅनलमध्ये सरळसर लढत होण्याची शक्यत आहे. दरम्यान, या “रणा’त तब्बल 299 उमेदवार उतरले असून सोमवारी (दि. 10) अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे.
त्यामुळे सोमवारी 299 पैकी किती इच्छुक उमेदवार गळणार की या 299 जणांमध्ये अंतिम लढाई रंगणार हे स्पष्ट होणार आहे. त्यातच सध्या पॅनलमधील उमेदवार ठरले नसल्याने विरोधक व सत्ताधारी हातमिळवणी करून निवडणूक बिनविरोध करणार असल्याच्या चर्चेने माळेगावचे “रणक्षेत्र’ ढवळून निघाले आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह सभासद, सत्ताधारी व विरोधकही संभ्रमात पडले आहे.
होय, आम्हाला कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याची ऑफर होती पण ती आम्ही नाकारली. आम्हीदेखील काहीकाळ पवारांच्या तालमीत होतो त्यामुळे त्यांचे सगळे डावपेच आम्हाला माहीत आहेत. विरोधकांनी खोळसांडपणे अशा प्रकारचा अफवा पसरवून सभासदांना संभ्रमित करण्याचा डाव सुरू केला आहे. मात्र, त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही. तसेच कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार ही अफवाच आहे.
– रंजन तावरे, अध्यक्ष, माळेगाव कारखाना
दिलजमाईचा निर्णय हा वरिष्ठ पातळीवरील आहे. स्थानिक पातळीवर याबाबत काहीच कल्पना नाही. तसेच कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणार ही अफवाच आहे. निवडणूक तर होणार असून आम्ही त्यासाठी सज्ज आहोत.
– बाळासाहेब तावरे, माजी अध्यक्ष, माळेगाव कारखाना