नवी दिल्ली – सोशल मीडिया साईट म्हणून ट्विटरला त्यांच्या अकाऊंटवर पोस्ट केल्या जाणाऱ्या माहितीसंबंधात त्यांच्यावर खटला किंवा गुन्हा दाखल करण्यावरून त्यांना संरक्षण दिले जात होते पण हे संरक्षण आता भारत सरकारने काढून घेतले आहे.
माहिती तंत्रज्ञान नियमांचे व नवीन आदेशांचे पालन केले नाही म्हणून त्यांच्यावर ही कारवाई केली गेली आहे.
त्यामुळे आता ट्विटरवर जो कोणताही आक्षेपार्ह किंवा प्रक्षोभक मजकूर प्रसारीत झाला तर आता त्याबद्दल थेट ट्विटर कंपनीला जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.
या आधी अशा स्वरूपाच्या पोस्ट टाकणाऱ्यांवरच केवळ कारवाई होत असे व ट्विटरला त्या कारवाईपासून संरक्षण मिळत असे. कारण या पोस्टशी त्यांचा व्यक्तिश: संबंध नाही असे मानले जाई. पण आता मात्र अन्य डिजीटल मीडियाला आक्षेपार्ह माहितीविषयी जे नियम आहेत तेच नियम ट्विटरला लावले जाणार आहेत. त्यामुळे ट्विटरच्या अडचणीत वाढ झाली आहे.
नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांनुसार निर्धारित मुदतीत तक्रार निवारण अधिकारी आणि नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा आदेश भारत सरकारने त्यांना दिला होता. पण त्याचे त्यांनी पालन केले नाही अशी भारत सरकारची तक्रार आहे.
त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या गुगल, फेसबुक, व्हॉट्सऍप, शेअरचॅट, टेलिग्राम, लिंकडईन अशांना मात्र याचे संरक्षण कायम ठेवण्यात आले आहे कारण त्यांनी सरकारी आदेशाचे पालन केले आहे.