नवी दिल्ली – अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर झाल्यामुळे बरीच अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र ही परिस्थिती हाताळण्यासाठी भारत सरकार समर्थ आहे. त्यामुळे या घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही असे उद्योजकांच्या संघटनेने म्हटले आहे.
असोचेम या उद्योजकांच्या संघटनेने यासंदर्भात काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गेल्या एक महिन्यापासून भारत सरकार अफगाणिस्तानच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करीत आहे. अफगानमधील भारतीय नागरिकांना परत आणण्यात आले आहे.
सरकारने गेल्या काही वर्षापासून अफगाणिस्तानमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी तांत्रिक आणि आर्थिक मदत केली आहे. आगामी काळात परिस्थिती सुधारल्यानंतर भारत सरकार त्या अनुषंगाने आगामी काळात योग्य तो निर्णय घेईल.
भारत सरकार अफगाणिस्थानच्या अनुषंगाने जो काही निर्णय घेईल त्याला भारतातील उद्योजकांचा पाठिंबा असेल. याबाबत केंद्र सरकारबरोबर उद्योजकांच्या संघटना चर्चा करतील असे सांगण्यात आले. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान जवळजवळ एक अब्ज डॉलरचा व्यापार आहे. मात्र लघु पल्ल्यात तरी या व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अफगाणिस्तानबरोबर व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे.