नवी दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (14 सप्टेंबर) सुरू होत आहे. त्या अधिवेशनात भारत-चीनमध्ये सीमेवर निर्माण झालेला तणाव आणि करोनास्थितीची हाताळणी या मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाईल. मात्र, विरोधकांमधील फाटाफुटीचा लाभ त्यांच्या शाब्दिक हल्ल्यांची धार बोथट करण्यासाठी होईल, असा विश्वास सत्ताधाऱ्यांना वाटत आहे.
विविध मुद्द्यांवर विरोधकांमध्ये मतैक्य नसल्याचे सरकारचे नेतृत्व करणाऱ्या भाजपला वाटत आहे. त्यासंदर्भात भाजपच्या सूत्रांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकेकडे लक्ष वेधले. सीमेवरील तणावाच्या स्थितीवरून राहुल सातत्याने सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. मात्र, त्या टीकेला इतर विरोधी पक्षांकडून फारसा पाठिंबा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अधिवेशनातील चर्चेवेळी त्या मुद्द्यावरून कॉंग्रेस पक्ष एकाकी पडू शकतो, असे त्या सूत्रांनी म्हटले.
देशातील करोना संकटावरूनही विरोधकांकडून मोदी सरकारवर शाब्दिक फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे. मात्र, देशातील महाराष्ट्रासारख्या ज्या राज्यांत करोनाचा अधिक फैलाव आहे; त्या राज्यांत विरोधी पक्षांची सत्ता असल्याकडे भाजपच्या सूत्रांनी लक्ष वेधले. त्यामुळे विरोधकांवर शाब्दिक प्रतिहल्ला करण्याची रणनीती सत्ताधाऱ्यांनी आखल्याचे स्पष्ट होत आहे.