मुली, सुना, नातीने आजोबावर केले अंत्यसंस्कार : भावकी, राजकीय नेते पुढे येईना
हृदयविकाराने झाले निधन; पण करोनाचा संशय कायम
रांजणगाव गणपती (वार्ताहर) – येथील 82 वर्षीय मृत व्यक्तीवर त्यांच्या दोन मुली, दोन सुना व एका नातीने अत्यंसंस्कार केले. यावेळी भावकी आणि राजकीय नेत्यांच्या माणूसकीचा ओलावा कमी झाल्याने माणूसकी खजिल झाल्याचा प्रत्यय समोर आला.
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील देवाचीवाडी येथे नामदेव सखाराम खेडकर (वय 82) यांचे (दि. 8) खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. परंतू वाडीत काही दिवसांपूर्वीच करोनाने दोघांचा मृत्यू झाला होता. खेडकर यांचाही मृत्यू करोनानेच झाला असावा, या संशयाने भावकी, नेता सुद्धा कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पुढे आला नाही.
खेडकर यांचा मृतदेह 6 तास दवाखान्यातच होता. 2 सुना, 2 मुली, नात यांना काय काहीच सुचत नव्हते. शेवटी डॉक्टरांनी रांजणगावचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना ही माहिती दिली. राऊत यांनी खेडकर यांची नात किरण पिंगळे हिच्याशी संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. त्यांनी डॉक्टरांना खेडकरांची चाचणी करायला सांगितली. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. राऊत यांनी 1 पोलीस आणि 2 कर्मचारी खेडकर कुटुंबाच्या मदतीला पाठवले.
खेडकर यांच्या दोन्ही मुलांचा 10 ते 12 वर्षांपूर्वी आणि जावयाचाही 16 वर्षांपूर्वी अपघाती मृत्यू झाला. त्यामुळे घरात कोणीच कर्ता पुरुष नाही. नातवंडे लहान, दोन सुना, दोन लेकी आणि एक नात…भावकी. भावकीतील एकही माणूस दवाखान्यात फिरकेना… अशावेळी वडिलांचा अंत्यविधी कसा होणार? असा प्रश्न लेकींना पडला होता. त्यांच्या अंत्यविधीसाठी भावकीतील 4 जणही पुढे येत नसल्याने सुना हतबल झाल्या. काही नातेवाईक नुसताच सल्ला देऊ लागले. परंतू नातीने (मुलीची मुलगी) आजोबांचा अंत्यविधी हा गावातच करायचा, असा निश्चय केला. राऊत हे देवदूतप्रमाणे धावून आले. त्यांनी शिवाजी खेडकर यांच्या सहकार्यामुळे 2 मुली, 2 सुना आणि नात यांनी खेडकर यांचा अंत्यविधी केला.