वाई (प्रतिनिधी) – सध्या संपूर्ण देशासह महाराष्ट्र तसेच सातारा जिल्हादेखील करोनासारख्या जागतिक महामारी ठरलेल्या करोनाशी लढत आहे. मात्र, वाई तालुक्यातील काही विकृत प्रवृत्ती या डोंगरांना वणवे लावण्यात मग्न आहेत. या विकृतांकडून वारंवार डोंगर पेटविले जात असल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरणाची हानी होत आहेच, शिवाय पशुपक्षांनाही या वणव्याची झळ पोहोचत असल्याने वाई तालुक्यातील हे वणव्यांचे तांडव थांबेल तरी कधी? असा आर्त सवाल पर्यावरणप्रेमींसह जोखीम उचलून वणवा आटोक्यात आणण्यासाठी झगडणाऱ्यांकडून होत आहे.
सध्या देशासह राज्यावर करोनाचे भयंकर संकट ओढवले आहे. राज्य सरकारसह पोलीस प्रशासन, डॉक्टर यांच्यासह सर्वचजण करोनाशी लढा देत आहेत. काही विकृत्त प्रवृत्तींना त्याचे काही देणेघेणे नाही. वाई तालुक्यातील समाज कंटक मात्र वणवा लावण्यातच समाधान मानत आहेत. समाजकंटकांनी जणू वनविभागाला चॅलेंजच दिले आहे, तुम्ही वणवा आटोक्यात आणा, आम्ही तो पुन्हा लावू’ त्यावर उपाय म्हणून वणवा रोखण्यासाठी प्रत्येक गावात हेरखाते तयार करून समाज कंटकांना वणवा लावण्यापासून रोखण्याचा प्रयत्न होवू शकतो व वणव्याचे तांडव थांबविण्याचा प्रयत्न होऊ शकतो, वणव्यामुळे वाईच्या पश्चिम भागातील सर्व डोंगर बोडके झाले आहेत. काळेकुट्ट पडले आहेत.
वणवा विरोधी मुलांचा मोठा ग्रुप तयार आहे. वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग राबवण्याचा राबविण्यात यावा. त्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.वाई तालुक्यातील पर्यावरण प्रेमी मुले वणवा आटोक्यात आणण्यासाठी स्वत:च्या जीवाची बाजी लावत आहेत, परंतु समाजकंटकांकडून पुन्हा पुन्हा वणवा लावला जात आहे. अनेक सरपटणारे जीव या वणव्यात जळून खाक होतात, परंतु पर्यावरणाच्या जीवावर उठलेल्या समाज कंटकाना त्याचे काही देणेघेणे नाही, संपूर्ण देश महासंकटात असताना वणवा लावण्यापासून रोखणे हे एक मोठे संकट सध्या वाई तालुक्यात वन विभागापुढे आ वासून उभे आहे.