Sanjay Shirsat – पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी 8.5 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश काढूनही नगर-नाशिक विभागातील राजकीय दबावामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आलेले नाही.
याच पाणी प्रश्नात शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उडी घेतली आहे. मराठवाड्याला त्याच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी आता रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. तर वेळप्रसंगी न्यायालयीन लढा देखील देण्याची तयारी त्यांनी दर्शविली.
शिरसाट म्हणाले की, मराठवाड्याला पाणी मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे. न्यायालयाने देखील आदेश दिला आहे, पण काही लोकांचा याला विरोध आहे. आमच्या हक्काचं पाणी द्यावे आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाणी देण्यात यावे.
तर, हक्काचे पाणी मराठवाड्याला मिळावे यासाठी आम्ही देखील न्यायालयात जाणार असून, वकिलांची फौजी उभी करणार आहे.
तसेच, नवीन धरण बनू नयेत अशी आमची मागणी आहे.
आहेत त्या धरणातून पाणी सोडले जात नाही, त्यामुळे नवीन धरणे झाल्यावर आणखी पाणी अडवले जाईल. पाणी मिळावे म्हणून आता आम्ही रस्त्यावर उतरणार आहे.
यासाठी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. तसेच, मराठवाड्यातील नेत्यांनी पक्ष बाजूला ठेवून, आपल्या हक्काच्या पाण्यासाठी एकत्र येण्याचे मी आवाहन देखील करत आहे.
प्रत्येक आईला मुलाबद्दल प्रेम असणारच
अजितदादा यांच्या आईनी त्यांच्या मुलाबद्दल मुख्यमंत्री होण्याची भावना व्यक्त केली आहे. प्रत्येक आई अशी भावना व्यक्त करते. माझा मुलगा मुख्यमंत्री व्हावा असे सर्वच आईला वाटते, असे शिरसाट म्हणाले.
तर, जनता आता आंदोलनाला कंटाळली आहे. त्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांनी आंदोलन केल्यास त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असेही शिरसाट म्हणाले.