परभणी : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये देखील दोन गट निर्माण झाले आहे. अजित पवार यांनी शिंदे- फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. मात्र शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा देण्यास नकार दिला आहे. यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार हे कालांतराने भाजपला पाठिंबा देतील, असे सूचक विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
काय म्हणाले बावनकुळे ?
“शरद पवारांची भूमिका आज वेगळी असली तरी कालांतराने वेगळंपण येत असते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार आणि खासदार हे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून अजित पवारांबरोबर आहेत. त्यामुळे कालांतराने शरद पवारही याचा विचार करतील. राज्य आणि देशाच्या हितासाठी सर्वच लोक एकत्र आले पाहिजे. शेवटी राष्ट्रहीत महत्त्वाचं आहे.”
“त्यांचा पक्ष एकच आहे. कालांतराने विचार बदलत असतात. आज शरद पवार नाही म्हणालेत, पण देश कल्याणासाठी काय केलं पाहिजे? असा विचार कधी ना कधी ते करतीलच,” असं सूचक विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. याशिवाय “सध्या विरोधीपक्षात खूप संभ्रम आहे. जसे २०२४ वर्ष जवळ येईल, तसे तुम्हाला विरोधीपक्षाच्या विधानमंडळातल्या खुर्च्या कमी होताना दिसतील” असंही बावनकुळे म्हणाले.