कोपरगाव -कोकमठाण सबस्टेशनचे काम कधी पूर्ण होणार, याची या सबस्टेशनवर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना आस लागली आहे. मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून कोकमठाण सबस्टेशनच्या कामात हलगर्जीपणा सुरू असल्यामुळे हे सबस्टेशन आजपर्यंत कार्यान्वित होऊ शकले नाही. त्यामुळे सुरू असलेला हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशी तंबी आ. आशुतोष काळे यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना दिली.
आ. काळे यांच्याकडे कोकमठाण सबस्टेशनचे काम सुरू होत नसल्याबद्दलच्या तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची खातरजमा करून त्यांनी रखडलेल्या कोकमठाण सबस्टेशनच्या कामाची नुकतीच पाहणी केली. कोकमठाण, जेऊर कुंभारी, डाऊच आदी गावांतील नागरिकांची व शेतकऱ्यांची विजेची होत असलेली गैरसोय दूर करण्यासाठी माजी आ. अशोकराव काळे यांनी विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील कोपरगाव मतदारसंघाचा विजेचा प्रश्न मार्गी लावून कोकमठाण येथे 5 एमव्हीए सबस्टेशनला मंजूर करून आणण्यात यश मिळविले होते. परंतु मागील काही वर्षांपासून या सबस्टेशनचे काम कासव गतीने सुरू असल्यामुळे आजही शेतकऱ्यांना विजेची अडचण येत आहे.
याकडे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गांभीर्याने पाहावे. अडचणी येत असतील, तर मला सांगा तुमच्या अडचणी सोडविल्या जातील. मात्र कोकमठाण सबस्टेशन हे येत्या काही दिवसांत सुरूच झाले पाहिजे, अशा सूचना आ. काळे यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना व ठेकेदारास दिल्या. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता भगवंत खरोटे, उपअभियंता यज्ञेश शेलार, कॉन्ट्रॅक्टर पुरुषोत्तम कुलकर्णी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, ग्रामस्थ विजय रक्ताटे, सुदाम लोंढे, दादासाहेब साबळे, गणेश रक्ताटे आदी सोशल डिस्टन्सिंग पाळून उपस्थित होते.