नवी दिल्ली – संसदेत विरोधक आणि सत्ताधारी हे वेगवेगळ्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यामुळे मागच्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाजच होऊ शकले नव्हते. हा पेच प्रसंग सोडवण्यासाठी कोणताही मधला मार्ग उपलब्ध नाही कारण आम्ही अदानी गैरव्यवहार प्रकरणात जेपीसी चौकशीच्या मागणीवर कसलीही तडजोड करणार नाही असे कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे की, अदानी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय चौकशी समिती नेमावी अशी मागणी 16 राजकीय पक्षांनी लाऊन धरल्यामुळे सरकारची तारांबळ उडाली आहे. त्यामुळेच त्यांनी थ्रिडी मोहीम सुरू केली आहे.
त्यात त्यांनी डिस्टॉर्ट, डिफेम आणि डायव्हर्टची भूमिका घेतली आहे असा आरोपही त्यांनी सरकारवर केला आहे. भाजपचे खासदार निशीकांत दुबे यांनी राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची केलली मागणी हा सरकारच्या लोकांचे लक्ष विचलीत करण्याच्या धोरणाचाच एक भाग आहे असेही जयराम रमेश यांनी नमूद केले.
कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधक चर्चेसाठी पुढे आल्यास संसदेतील पेच प्रसंगावर तोडगा निघू शकतो असे म्हटले होते. तथापि आज जयराम रमेश यांनी जी भूमिका घेतली आहे त्यानुसार सरकारला जेपीसी नेमायची की नाही यावरच यातून तोडगा निघू शकतो अशी स्थिती निर्माण झाली आहे.
राहुल गांधी यांनी विदेशातील वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी भाजपची मागणी आहे आणि विरोधकांनी जेपीसीची मागणी केली आहे. यात चर्चेतून तोडगा काढण्याचा मनोदय शहा यांनी व्यक्त केला असला तरी कॉंग्रेस व अन्य विरोधक जेपीसीची मागणी सोडण्याची शक्यता नाही.
राहुल गांधी यांनी माफी मागण्याऐवजी मोदींनी सहा देशांमध्ये जी भारत विरोधी वक्तव्ये केली आहेत त्यावर माफी मागितली पाहिजे अशी मागणी आता विरोधकांनी पुढे केली आहे. देशात सध्या अघोषित अणिबाणी निर्माण झाली आहे असा दावाही रमेश यांनी केला. राहुल गांधी यांच्या विधानांचा विपर्यास करून भाजपने खोटा प्रचार आणि कांगावा चालवला आहे असा आरोपही त्यांनी केला.