नवी दिल्ली – मिलिंद देवरा यांनी काॅंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भारत जोडो न्याय यात्रेपूर्वी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काही महिन्यांनंतर लोकसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरांसारख्या बड्या नेत्याने पक्ष सोडल्याने काँग्रेसचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. मिलिंद देवरा हे काँग्रेस सोडणारे पहिले नेते नाहीत. अलीकडच्या काळात मिलिंद देवरा यांच्यासह 11 बड्या नेत्यांनी पक्षाशी संबंध तोडले आहेत. 2019 पासून आतापर्यंत काॅंग्रेसची साथ सोडलेल्या नेत्यांबाबत माहिती जाणून घेऊया..
मिलिंद देवरा –
या यादीत मिलिंद देवरा पहिल्या क्रमांकावर आहेत. मिलिंद देवरा यांनी रविवारी काँग्रेसमधून राजीनामा देण्याची घोषणा केली. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर त्यांनी राजीनामा जाहीर केला होता. मिलिंद देवरा यांनी अलीकडेच उद्धव ठाकरे गटाने दक्षिण मुंबईतून निवडणूक लढवण्याचा दावा केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, त्यांनी आज अधिकृतपणे राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
कपिल सिब्बल –
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. कपिल सिब्बल यांनी 16 मे 2022 रोजी काँग्रेसमधून राजीनामा दिला होता. राजीनामा दिल्यानंतर आठवडाभरानंतर त्यांनी ही घोषणा केली. नंतर त्यांनी समाजवादी पक्षाकडून राज्यसभेचे खासदार म्हणून अर्ज दाखल केला.
गुलाम नबी आझाद –
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी 2022 मध्ये पक्षाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीरमध्ये डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी या नावाने स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे.
हार्दिक पटेल –
गुजरातचे पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी मे 2022 मध्ये काॅंग्रेसचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांनी 2019 मध्ये हार्दिक पटेल यांना पक्षात आणले होते. काॅंग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
अश्विनी कुमार –
माजी केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार यांनी पंजाब निवडणुकीच्या काही दिवस आधी फेब्रुवारी 2022 मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला होता. पक्षाचे अनुभवी नेते अश्विनी कुमार हे 2019 च्या निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष सोडणाऱ्या पहिल्या नेत्यांपैकी एक होते.
सुनील जाखड –
पंजाब काँग्रेस युनिटचे नेतृत्व करणारे सुनील जाखड यांनी तत्कालीन मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर टीका केल्याबद्दल नेतृत्वाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर 2022 मध्ये त्यांनी पक्ष सोडला होता. ते मे महिन्यात भाजपमध्ये दाखल झाले आणि त्याच वर्षी जुलैमध्ये त्यांना भाजप पंजाब युनिटचे प्रमुख बनवण्यात आले.
आर पी एन सिंग –
माजी केंद्रीय मंत्री आरपीएन सिंग जानेवारी 2022 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाले. उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी असे करणारे ते सर्वात प्रमुख नेते ठरले.
ज्योतिरादित्य सिंधिया –
सध्या केंद्रीय मंत्री असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 2020 मध्ये काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्या काळात मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले, त्यामुळे कमलनाथ सरकार पडले.
जितिन प्रसाद –
माजी केंद्रीय मंत्री आणि राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जाणारे जितिन प्रसाद यांनी 2021 मध्ये काँग्रेस सोडली. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या काळात ते उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे सर्वोच्च ब्राह्मण चेहरा होते. आपल्या निर्णयाचा बचाव करताना ते म्हणाले की, भाजप हाच खरा राजकीय पक्ष आहे.
अल्पेश ठाकोर –
काँग्रेसचे माजी आमदार अल्पेश ठाकोर यांनी जुलै 2019 मध्ये राज्यसभेच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराविरोधात मतदान केल्यानंतर पक्ष सोडला होता. काही दिवसांनंतर, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि राधापूरच्या पोटनिवडणुकीसाठी त्यांना रिंगणात उतरवले, परंतु निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत ते गांधीनगर दक्षिणमधून विजयी झाले होते.
अनिल अँटनी –
काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी केंद्रीय मंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी गेल्या वर्षी जानेवारीत पक्ष सोडला आणि पुढच्याच महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला.