नवी दिल्ली -तेलंगणात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे भारत राष्ट्र समितीला (बीआरएस) सत्ता गमवावी लागली. त्यानंतर बीआरएसने जुनेच नाव धारण करावे, अशी मागणी त्या पक्षातून पुढे येऊ लागली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या नेतृत्वाखालील बीआरएस पुन्हा तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) हे नाव स्वीकारणार का, याविषयीची उत्सुकता बळावली आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल विसरून बीआरएस आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज होत आहे. त्यासाठी पक्षाचे कार्याध्यक्ष असणारे केसीआरपुत्र के.टी.रामा राव मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत. त्या बैठकांवेळी अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्षाच्या नावाचा विषय उपस्थित करत आहेत.
नाव बदलल्याने पक्षाचे तेलंगणा राज्याशी असलेले नाते तुटल्याचे चित्र निर्माण झाले. त्याचा पक्षाला फटका बसला. बीआरएसच्या पराभवामागील कारणांमध्ये पक्षाच्या नावातील बदलाचाही समावेश असल्याची भावना ते व्यक्त करत आहेत.
तेलंगणा विधानसभा निवडणुकीला बराच अवधी असताना केसीआर यांनी राष्ट्रीय राजकारणात महत्वाची भूमिका निभावण्याच्या आकांक्षेतून हालचाली सुरू केल्या. देश पातळीवर भाजप आणि कॉंग्रेसला पर्यायी ठरणारी तिसरी आघाडी स्थापण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. त्यामध्ये त्यांना यश आले नाही. मात्र, व्यापक राजकीय आकांक्षेपोटी त्यांनी पक्षाचे नाव बदलले.