पाकिस्तानने विनंती केली तर भारताचा मदतीसाठी पुढाकार
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने चीनमध्ये चांगलाच तांडव घातला. दरम्यान, भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. यासाठी चीनने केलेल्या मदतीबद्दल भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आभार मानले आहेत. तसेच वेळ पडल्यास किंवा पाकिस्तान सरकारच्या विनंतीनंतर चीनमधील पाकिस्तानी नागरिकांची सुखरूप सुटका करण्याची तयारी असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ही माहिती दिली.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांना एका पत्रकाराने पाकिस्तानी विद्यार्थांची चीनमधून भारत सुटका करेल का? असा प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना रवीश कुमार म्हणाले की,पाकिस्तान सरकारने सध्या आम्हाला तशी विनंती केली नाही. मात्र, तशी परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर आम्ही नक्की विचार करू. कोरोनामुळे चीनमध्ये अडकलेले पाकिस्तानी विद्यार्थी मोदी है तो मुमकिन है, मोदी जिंदाबादचे नारे देत आहेत, असे रवीश कुमार यांना विचारले असता त्यांनी यावर फक्त स्मित हास्य केले.
चीनच्या नागरिकांना देण्यात आलेले नॉर्मल आणि इ-व्हिसा अधिकृत आणि वैध नसल्याचे रवीश कुमार यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. जर एखाद्या चीनमधील व्यक्तीला भारतात यायचे असल्यास त्यांना भारताच्या दूतवासाशी संपर्क साधून व्हिसासाठी अर्ज करावा लागेल, असेही कुमार म्हणाले.