मुंबई : राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. दरमहा १०० कोटी रुपये जमवून द्या, असे देशमुख यांनी सचिन वाझे यांना सांगितले होते, असा आरोप सिंग यांनी केला आहे. या लेटर बॉम्बनंतर भाजपा देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाला असून, आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने दिल्लीत बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित असणार आहे. तर शिवसेना नेते संजय राऊतही पवारांची भेट घेणार आहेत.
“दरमहा १०० कोटी रुपये जमवून द्या. मुंबईतली १७५० मद्यालये, पब, हुक्का पार्लर यांच्याकडून महिन्याला दोन ते तीन लाखांचा हप्ता घेतल्यास ४० ते ५० कोटी रुपये जमा होऊ शकतात. उर्वरित रक्कम अन्य मार्गाने जमा करता येईल, अशा सूचना गृहमंत्री देशमुख यांनी तत्कालिन साहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे आणि सहायक आयुक्त संजय पाटील यांना दिल्या होत्या,” असा गौप्यस्फोट परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला. या पत्रानंतर राज्यात राजकीय भूंकप आला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पत्रानंतर भाजपाकडून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून, राज्यात अचानक निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्लीत पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे उपस्थित राहणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊतही दिल्लीत जाणार असून, शरद पवार यांची भेट घेणार आहे. या बैठकीत अनिल देशमुख यांच्याबाबत चर्चा केली जाणार असून, शरद पवार नेमका काय निर्णय घेणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.