कोपरगाव -मालेगावमध्ये करोनाने थैमान घातले आहे. तेथील नागरिकांनी शिस्त पाळली नाही म्हणून तेथे बाधितांची संख्या वाढली आहे. मात्र त्यांच्या चुकीमुळे प्रशासनाने लॉकडाऊन वाढविले आहे. त्यामुळे मालेगावकरांच्या चुकीची शिक्षा कोपरगावकरांना का देता. कोपरगाव तालुक्यात सद्यस्थितीत एकही करोना रुग्ण नसल्याने काही प्रमाणात नियम शिथिल करून व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
कोल्हे यांनी नुकतीच तहसीलदार योगेश चंद्रे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह शहरातील छोटे-मोठे व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते. कोल्हे म्हणाल्या, राज्य सरकारने जिल्ह्याची झोननिहाय विभागणी केली आहे. मात्र ज्या तालुक्यात करोनाचा एकही रुग्ण नाही, तेथील छोटे-मोठे व्यवसाय, इतर कामे सुरू करण्यास परवानगी द्यावी. रेडझोन बाबत नियम असावेत. मात्र एकही रुग्ण नाही अशा तालुक्यांत शासनाने काही अटी व शर्तींवर व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांनी शासनाला सहकार्य केले आहे. सर्वांचेच व्यवसाय बंद असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तेव्हा नगरपालिकेने नागरिकांच्या पाठीमागे खंबीर उभे राहून शहराची पाणी व घरपट्टी माफ करावी. सहकारी पतसंस्थांनी देखील काही महिन्यांचे व्याज माफ करावे. माणसाच्या पाठीमागे माणूसकीने उभे राहण्याची ही वेळ आली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर सकारात्मक योग्य निर्णय घेवून ठप्प झालेली बाजारपेठ अटी-शर्तींवर माणूसकीच्या भावनेतून सुरू करावी.
दरम्यान कोपरगाव शहरातील दुकाने व छोटे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दूरध्वनी करून साकडेही घातले. कोपरगाव तालुका नागरिकांच्या सहकार्यामुळे व प्रशासनाच्या प्रयत्नामुळे करोना मुक्त आहे. त्यामुळे शासनाने नियम व अटींवर छोट्या व मोठ्या दुकानदारांना आपापल्या आस्थापना उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी विविध व्यवसायिकांसह व्यापाऱ्यांकडून करण्यात आली. या मागणीचा सकारात्मक विचार करुन वरिष्ठांशी चर्चा करून,मार्ग काढण्याचे अभिवचन तहसीलदार चंद्रे यांनी दिले.