मुंबई – आयकर विभागाने कुठे छापेमारी करावी हा त्यांचा निर्णय आहे. माझ्या संबंधित असलेल्या कंपन्यांचे सर्व कर वेळेवर भरले जातात. मी स्वत: अर्थमंत्री असल्याने याची काळजी घेतो. पण माझ्या नातेवाईकांच्या संबंधित कंपन्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. आता ते अजित पवारांचे नातेवाईक आहेत म्हणून त्यांच्यावर धाडी टाकत आहेत. या गोष्टीचे मला वाईट वाटते, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, माझ्याशी संबंधित कंपन्यांवर धाड टाकली याबद्दल मला काही म्हणायचे नाही. आम्ही दरवर्षी कर भरतो. मी अर्थमंत्री असल्याने मला वित्तीय शिस्तीची जाणीव आहे. माझ्याशी जोडलेल्या सर्व घटकांनी कर भरला आहे. पण मी ही एक नागरिक आहे.
मी अस्वस्थ आहे, ज्यांची 35-40 वर्षापूर्वी लग्न झाली, त्यांचा चांगल्या पद्धतीने संसार सुरु आहे. त्या तीन बहिणींवर, कोल्हापूरातील एका आणि पुण्यातील दोन बहिणींवर धाडी टाकल्या.
त्याचे कारण मला माहिती नाही. ते व्यवस्थित आपले जीवन जगत आहेत. त्यांच्या मुलांची-मुलींची लग्न झाली आहेत, नातवंडं आहेत. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्यातील जनतेने याचा जरुर विचार करावा. कोणत्या स्तरावर जाऊन या संस्थांचा वापर केला जातो, हे पाहावे, असे ते म्हणाले.
माझ्या कंपन्यांवर धाड टाकली याचे मला काही नाही, पण नातेवाईकांवर धाड कशी? त्यांचा संबंध नसताना धाड टाकली याचे मला वाईट वाटले. इतक्या खालच्या स्तरावर जाऊन राजकारण मला पटलेले नाही. सरकार येत असतं, जात असतं, पण जनता सर्वस्व आहे. जनता योग्य तो निर्णय घेत असते, असे त्यांनी सांगितले. तसेच केंद्रात सत्तेवर आहे त्यांच्या कुठल्या नेत्यावर धाड पडली? आता हे लोकांनी पाहायला हवे की देशाचा विकास करण्यासाठी आपण यांना सत्ता दिली. पण हे वेगळेच प्रकार सुरू आहेत, असेही ते म्हणाले.