बेळगाव : भाषा वेगवेगळ्या असल्या तरी दोन्ही राज्यांमध्ये आणि लोकांमध्ये वाद असू नये असे आम्हाला वाटते. कारण देश एकच आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले. बेळगावचे प्रकरण हे न्यायप्रविष्ठ आहे. आपण घटना मानणारे लोक आहोत. हा सांस्कृतिक वाद आहे. आपले मराठी लोकही इतर राज्यात राहतात. ही मराठी अस्मिता आपण कुठेही राहिलो तरी ती टिकवण्यासाठी आपण काम करावे असे संजय राऊत म्हणाले.
नाथ पै व्याख्यानमालेचे उद्घाटन शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांची मुलाखत घेण्यात आली. गोगटे रंगमंदिरात राऊतांची ही मुलाखत झाली. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमस्थळी कर्नाटक पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. संजय राऊत यांच्या बेळगाव दौऱ्यामुळे तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे.
राऊत म्हणाले, शिवसेनेचे हिंदुत्व हे गाडगे महाराजांचं आहे. तहानलेल्या पाणी द्या आणि भुकेलेल्याला अन्न द्या असे आमचे हिंदुत्व आहे. असे संजय राऊत म्हणाले. दोन समुदायात भांडण लावून पोळी शेकायची असे आमचे राजकारण नाही. मुस्लिमांनी भारतीय म्हणून राहावे. त्यांचे काउन्सेलिंग करावे असे संजय राऊत म्हणाले.
हिंदूंच्या मनात विष कालवले जात आहे. त्यांनाही काउन्सेलिंगची गरज आहे. आसाम आणि काश्मीरची परिस्थिती चिघळली आहे. कलम 370 रद्द केल्याचे आम्ही अभिनंदन केले. पण आता तिथली परिस्थिती भयानक आहे. तिथला मुद्दा हा हिंदू-मुस्लीम हा झाला आहे. पण हा भारताचा मुद्दा व्हायला हवा. सध्या लोका-लोकांमध्ये फूट पाडली जात आहे. धर्माच्या आधारावर जर चालत राहिलो तर आपली स्थिती पाकिस्तानसारखी होईल. देशाची फाळणी तर होणार नाही ना, अशी भीती मला वाटते, असे राऊत म्हणाले.
सध्या सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षच नको आहे. पं. नेहरूंच्या काळात अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारख्या विरोधी पक्षातील नेत्याचा आदर सन्मान ठेवला जायचा. पण आता केंद्रातील सत्ताधाऱ्यांना वाटते आहे की विरोधी पक्षच नको. आपल्या संतांनी म्हटले होते निंदकांचे घर असावे शेजारी. ही खरी हिंदू संस्कृती आहे पण सत्ताधाऱ्यांना विरोधकच नको आहेत, असेही राऊत म्हणाले.