कोलकता – पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक स्थानिक ते जागतिक मुद्द्यावर बोलतात. मात्र, हृदय पिळवटून टाकणाऱ्या हाथरस प्रकरणावर ते अजूनही काही बोलले नाहीत. ते मौन का बाळगून आहेत? हाथरस प्रकरणामुळे त्यांचा ढोंगीपणा उघड झाला आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधिररंजन चौधरी यांनी सोडले.
सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ही मोदींची घोषणा कुठे गेली? आता त्यांनी शट अप इंडिया, हश अप इंडिया अशी नवी घोषणा द्यावी, अशी टिप्पणी चौधरी यांनी ट्विटरवरून केली. त्यातून देशाने गप्प (शट अप) रहावे, देशाचा आवाज दाबून टाकला (हश अप) जावा असे मोदींचे धोरण असल्याचे त्यांनी सूचित केले.
हाथरस प्रकरणावरून देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी देशात विविध ठिकाणी निदर्शने होत आहेत. पश्चिम बंगाल कॉंग्रेसनेही निषेधासाठी सोमवारी धरणे आंदोलन केले.
त्यापार्श्वभूमीवर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचीही जबाबदारी सांभाळत असणाऱ्या चौधरी यांनी मोदींना लक्ष्य करणारे ट्विट केले.