मुंबई: राज्यातील सत्ता कोंडी आता फुटण्याच्या मार्गावर असून, शुक्रवारी शिवसेना आमदारांची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलावली आहे. या बैठकीनंतर सेना आमदारांना जयपूरला हलविण्यात येणार आहे, अशी माहितीसमोर येतीये. मात्र जयपूर नको आम्हाला गोव्याला न्या, अशी मागणी शिवसेनेचे आमदार करत असल्याची माहिती शिवसेनेच्याच एका आमदारांनी दिलीये.
आज आघाडीच्या नेत्यांमध्ये बैठक झाली असून, सत्ता स्थापनेची चक्रे आता वेगवान झाली आहेत. काल आणि आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका पार पडल्या. या बैठकीत शिवसेनेसंदर्भातला अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. तसंच शिवसेनेने सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल ओळख परेड घेऊ शकतात. त्यामुळे उद्याच्या बैठकीसाठी सेना आमदारांना ओळखपत्र घेऊन या, असंही सांगण्यात आलं आहे.
सत्ता स्थापनेबाबत संघर्ष सुरु असताना शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईच्या द रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हाच या आमदारांनी गोव्याला जायची इच्छा बोलून दाखवली होती. एकाच ठिकाणी आणि एकाच हॉटेलमध्ये राहत असल्याने मन लागत नसल्याचं सेना आमदारांनी सांगितलं होतं. आमदारांच्या या मागणी नंतर पुढच्या वेळी गोव्याला घेऊन जाऊ, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितल होत.
दरम्यान, शुक्रवारी उद्धव ठाकरेंशी भेट झाल्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईहून जयपूरला रवाना करण्यात येणार असल्याची माहिती समजतीये. त्यामुळे आम्हाला जयपूर नको तर गोव्याला पाठवा अशी मागणी आमदारांकडून करण्यात येतीये.