मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने टोमॅटोच्या दरवाढीवर केलेल्या टीकेला उत्तर देत बीडमधील शेतकऱ्यांनी टोमॅटोचे मोफत पार्सल त्याला पाठवले आहे. ”सुपरस्टार असलो म्हणून काय झाले, आम्हाला देखील महागाईचा फटला बसतो. मी या दिवसात टोमॅटो खाणे कमी केले’ असल्याचे वक्तव्य सुनील शेट्टीने गेल्या काही दिवसांपूर्वी केले होते.
या वक्तव्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरावरून टीका होत आहे. तसेच टोमॅटोचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना चांगला दर मिळत असून सुनील शेट्टी सारख्या कोट्यावधी लोकांच्या पोटात दुखत असल्याचे देखील आता म्हटले जात आहे. याच विधानाचा निषेध म्हणून परळीतील सामाजिक कार्यकर्ते डॉ. संतोष मुंडे यांनी शेतकऱ्यांसह सुनील शेट्टीला मोफत टोमॅटोचे पार्सल पाठवले आहे. तसेच अभिनेत्याच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकरी संतोष मुंडे म्हणाले की, ‘जेव्हा टोमॅटोचे दर 2 रुपये प्रती किलोपर्यंत पोहचतात तेव्हा शेतकऱ्यांच्या मेहनतीची कोणाला पर्वा नसते. शेतकऱ्यांना त्यांची मेहनत रस्त्यावर फेकून द्यावी लागते. शेतकऱ्यांच्या व्यथा कोणी समजू शकत नाही. अशा वेळी सुनिल शेट्टी यांच्यासारखी लोकं कुठे असतात…
एका सिनेमासाठी कोट्यवधी रुपयांचं मानधन घेणारा, अनेक महागड्या गाड्यांमध्ये फिरणारा, हजारो रुपये खर्च करणारा सुनिल शेट्टी अनेक हॉटेलांचा मालक आहे. तो वर्षाला 100 कोटी रुपये सहज कमावतो. अशात जर शेतकऱ्यांनी चार पैसे कमावल्यावर सुनिल शेट्टी सारख्या लोकांच्या पोटात का दुखतं..’ असा सवाल संतोष मुंडे यांनी केला आहे.
नेमकं सुनील शेट्टी काय म्हणाला होता…
“टोमॅटोचे दर वाढल्यामुळे मी टोमॅटोची खरेदी कमी केली आहे. टोमॅटो अधिक खात नाही. मी स्टार आहे, म्हणून सर्वांना असं वाटतं की या सर्व गोष्टींचा माझ्यावर काही परिणाम होत नसेल. पण असं काहीही नाही, सुपरस्टार असलो तरी या सर्व गोष्टींचा सामना आम्हाला देखील करावा लागतो…’ असं अभिनेता म्हणाला होता.