मुंबई: पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? मंदिर हा हिंदूंचा श्रध्देचा विषय आहे त्यात राष्ट्रवादीला त्रास होण्यासारखं काय? असा प्रश्न भाजप नेते निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे. सोलापूर येथे कोरोना संदर्भात बैठकीत बोलताना राम मंदिर बांधून कोरोना जाणार का?, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना लगावला होता.
काय म्हणाले होते शरद पवार?
“करोना हे देशावरचे मोठे संकट आहे. त्यावर यशस्वीपणे मात करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार एकत्रित आले पाहिजे. एकमेकांशी योग्य समन्वय साधून काम झाले पाहिजे. करोनाचे भयसंकट परतवून लावण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे, हे प्राधान्याने ठरविले पाहिजे. परंतू, मंदिर बांधून करोनाचं संकट दूर होईल, असं काही मंडळींना वाटतं आहे. राम मंदिर बांधून करोना आटोक्यात येत असेल तर भूमिपूजन अवश्य करा. फक्त करोनाचं संकट दूर व्हावं हीच आमची इच्छा आहे.”
5 ऑगस्टला नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिरांचे भूमिपूजन
उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचे काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख देखील निश्चित झाली आहे. येत्या 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरांचे भूमिपूजन करणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या भूमिपूजन सोहळ्याला ठराविक लोकच उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.