जयपूर – काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर राजस्थानच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली आहे. राजस्थानात काँग्रेस सरकार स्थापन झाल्यापासूनच गेहलोत व पायलट यांच्यादरम्यान खटके उडत असल्याच्या चर्चा अनेकदा रंगल्या. मात्र पायलट यांच्या बंडानंतर हा वाद चव्हाट्यावर आलाय. मुख्यमंत्री गेहलोत हे गेल्या काही दिवसांपासून पायलट यांच्यावर उघडउघड आरोप करताना दिसतायेत.
अशातच आज गेहलोत यांनी पायलट यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र डागलंय. याबाबत बोलताना त्यांनी, “पायलट हे गेल्या सहा महिन्यांपासून राजस्थान सरकार पाडण्यासाठी भाजपसोबत कट रचत होते. मात्र तेव्हा मी या कटाबाबत माहिती सांगितली असता माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. एवढा निरागस चेहरा असलेला व्यक्ती असे कारस्थान रचू शकतो यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता.” असा आरोप लगावला.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी १८ आमदारांना बजावलेल्या नोटीसीवर उच्च न्यायालयात सुनावणी आहे. उच्च न्यायालय काय निकाल देते यावर राजस्थानातील राजकीय गणित ठरणार आहेत. उच्च न्यायालयानं आधीच अपात्र करण्याच्या नोटीसीवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांना दिलेले आहेत. त्यामुळे मंगळवारपर्यंत या नोटीसीवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही.