नांदेड – सत्ता मिळाल्यास ओबीसी आरक्षणाचा प्रश्न त्वरित सोडवतो, असे जे प्रतिपादन भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी फडणवीसांना सत्तेवर येण्याची गरज काय आहे. त्यांनी ओबीसींचा विषय कशा मार्गाने सोडवता येईल, याची माहिती आम्हाला द्यावी, आम्ही त्यानुसार तो प्रश्न सोडवू. त्यासाठी फडणवीसांना सत्तेवर येण्याची गरज नाही. सत्ता मिळाल्याशिवाय कोणाच्याच हिताचे काम करणार नाही ही भूमिका बरोबर नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
सत्ता मिळेपर्यंत ओबीसींच्या हिताचे कामच करणार नाही, अशी भूमिका एखाद्या लोकप्रतिनिधींनी घेणे योग्य नाही. त्यांना ओबीसींचा इतका कळवळा आहे, तर त्यांनी भुजबळांना तुरुंगात खितपत का ठेवले, असा सवालही त्यांनी केला. भारतीय जनता पक्षातील ओबीसींचे नेतृत्व संपवण्याचे काम या नेत्याने केले होते, असा दावाही पाटील यांनी केला.