नागपूर – काँग्रेसला सोडून कोणी जाणार नाही आणि जायचे असेल त्यांनी लवकर जावे, अशी रोखठोक भूमिका काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शुक्रवारी येथे प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मांडली. पक्षासाठी आणि पक्षाच्या आदर्शावर काम करणारा कोणीही कार्यकर्ता पक्ष सोडून जाणार नाही, असे ते म्हणाले.
काँग्रेस सत्तेसाठी नाहीतर लोकांसाठी लढणारा पक्ष आहे. विचारधारेसाठी आमची लढाई आहे. काँग्रेस कार्यकर्ता जनतेसाठी काम करतो. पण काही लोकांना पदाशिवाय राहावत नाही. पद नसले की ते निघून जातात. जाणाऱ्यांमुळे काँग्रेसचे काहीही नुकसान होणार नाही. महाराष्ट्र काँग्रेस सक्षम असून कोणी जाणार नाही, असे चेन्नीथला यांनी सांगितले.
काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी या विभागीय बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठका ग्रामीण भागात पाळेमुळे अधिक भक्कम करण्यासाठी घेण्यात आल्या आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात येत आहे. कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतल्यामुळे उमेदवार निवडीला मदत होईल, असे चेन्नीथला म्हणाले.
जागा वाटपाबाबत महाविकास आघाडी सोबत चर्चा झालेली आहे. येणाऱ्या दिवसात कोणाला किती जागा दिल्या जाईल यावर शिक्कामोर्तब होईल. त्या नंतर मीडियाला कळेलच. बऱ्याच जागांवर सहमती झालेली आहे. येणाऱ्या दिवसात फायनल यादी जाहीर करू असे ते म्हणाले. पहिल्यांदा आदिवासी भागामध्ये गडचिरोलीमध्ये जाऊन आम्ही बैठक घेणार आहोत. शहरात नेहमीच बैठका होतात. म्हणून यावेळेस ग्रामीण भागात जात आहोत, असे ते म्हणाले.
हिंदू धर्माचे चार शंकराचार्य राम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी जाणार नसतील तर तुम्ही आम्हाला का प्रश्न विचारता? या कार्यक्रमाचे राजकीयीकरण झाल्याचे शंकराचार्यांचे म्हणणे आहे. पंतप्रधान उद्घाटन करणार आहे म्हणजे हे राजकारणच आहे. रामाला आम्ही मानतो. हजारोंच्या संख्येत आम्ही जाऊ. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय फायदा घेण्यासाठी हे सगळे सुरू आहे. त्याच्याशी आम्ही सहमत नाही, अशी टीका चेन्नीथला यांनी केली.