भोर – भोर शहरातील दोन दिवसापासून पाणीपुरवठा खंडीत असल्यामुळे शहरातील चौपाटी, वेताळपेठ, लक्ष्मीनगर झोपडपट्टी परिसरात टॅंकरने मोफत पाणी वाटप करण्यात आला आहे.
भाटघर धरण 86 टक्के भरलेले असतानाही केवळ नगरपलिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे भोर शहरात मागील एक महिन्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यातच गेल्या दोन दिवस पाणी आले नसून रात्रीपासून भाटघर पंप हाऊस येथील वीजपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाण्याशिवाय नागरिकांचे मोठे हाल सुरु आहेत. त्यांना साधे पिण्याचे पाणीही देता येईना, असा सूर ऐकायला मिळत आहे.
मात्र, सामाजिक कार्यकर्ते अभिषेक येलगुडे यांच्या सहकार्याने चौपाटी येथील जवाहर तरुण मंडळाचे अध्यक्ष शुभम शेटे यांनी भोर शहरातील चौपाटी, शेटेवाडी वेताळपेठ, लक्ष्मीनगर झोपडपट्टी, परिसरात टॅंकरने मोफत पाणी वाटप करुन नागरिकांना दिलासा दिला आहे.
भोर शहरात मागील तीन दिवस पाणीपुरवठा बंद असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह कपडे धुणे, अंघोळीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी भर पावसाळ्यात नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे. त्यात पावसाने उघडीप दिली असून ऊन पडल्याने पावसाचे पाणी छप्परावरुन वळचणीचे पाणी मिळत नाही.सर्वसामान्य लोकांकडे बोअरवेल नाहीत. त्यामुळे नागरिक पाण्यावाचून हैराण झाले आहेत. भोर नगरपलिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे तर नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांचीही डोळेझाक होत आहे. त्यामुळे नागरिकांनी तक्रार कोणाकडे करायची, अशी आवस्था झाली आहे.
भाटघर पंप हाउस येथील वीज पुरवठा अद्याप बंद असल्यामुळे पंप हाउस येथून भोर शहराला होणारा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चाने 40 हजार लिटर पिण्यायोग्य पाणी टॅंकरने वाटप करण्यात आले आहे. शुक्रवार (दि. 18) पाणीपुरवठा सुरु न झाल्यास संपूर्ण भोर शहरातील भागात टॅंकरने पाणी पुरवठा केला जाईल, असे जवाहर तरुण मंडळाचे अध्यक्ष शुभम शेटे यांनी सांगितले.