शायद मेरी शादी का खयाल दिलमें आया है…, तेरी निगाहोपे मर मर गये हम…, हसनुम आया है यहॉंप्पे…, बरखा रानी जरा जमके बरसो… यासारख्या अनेक सुमधुर सुरेल गाण्याची जन्मदाती संगीतकार उषा खन्ना. हिंदी सिनेसंगीत सृष्टीतील साठच्या सुवर्ण कालखंडातील एक लोकप्रिय प्रतिभासंपन्न महिला संगीतकार. जिचा तिच्या कारकिर्दीच्या साठाव्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या वतीने लता मंगेशकर सारखा एक अत्यंत मानाचा पुरस्कार देऊन यावर्षी सन्मान करण्यात आला. त्या ज्येष्ठ महिला संगीतकाराची महती सांगण्याचा एक इवलासा प्रयत्न…
महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतीच 2019-20 साठी लता मंगेशकर पुरस्कारासाठी हिंदी संगीतसृष्टीमधील ज्येष्ठ महिला संगीतकार उषा खन्ना यांची निवड केल्याचे अनेकांनी वाचले असेल. मुळातच ज्या हिंदी संगीतसृष्टीत महिला संगीतकारांची प्रथमपासूनच वानवा आहे. अशा या पुरुषप्रधान किंबहुना पुरुष संगीतकारांचाच जेथे एकछत्री अंमल सुरुवातीपासूनच आहे. अशा पुरुषांची संपूर्ण मक्तेदारी असलेल्या हिंदी संगीतसृष्टीत महिलांनी गीतकार वा संगीतकार म्हणून शिरकाव करणे महाकर्म कठीण.
उषा खन्ना पूर्वी हिंदी सिनेसंगीतसृष्टीत आपल्या अल्पस्वल्प कारकिर्दीत ज्यांनी आपल्या सांगितिक कारकिर्दीचा ठसा उमटवला त्यात सरस्वतीदेवी अन् स्व. नर्गिसच्या मातोश्री भारतीय शास्त्रीय संगीताच्या जाणकार जद्दनबाई यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. अशा या महिलांना नो एन्ट्री समवातावरण असलेल्या सिनेसंगीतसृष्टीत संगीतकार म्हणून 1959 मध्ये उषा खन्ना यांचा वाजतगाजत झालेला प्रवेश हे एक आश्चर्यच होते. कारण ‘दिल देके देखो’ सारखा फिल्मिस्तानचा चित्रपट “तुमसा नहीं देखा’ सारख्या सुपरडुपरहिट चित्रपटांचा वारसा लाभलेले नासिर हुसेन सारखे दिग्दर्शक अन् “तुमसा नहीं देखा’मुळेच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला शम्मी कपूरसारख्या नायकाच्या चित्रपटाला ओ. पी. नय्यरऐवजी उपा खन्ना सारखी नवोदित तरुणी संगीत देते ही बातमी अनेकांच्या भुवया उंचावणारीच होती; पण अटळ ते होणे होते, अशक्य ते घडणे होते. त्यामुळेच उषा खन्नाच्या निमित्ताने ही महिला संगीतकार उगवली. या नवोदित संगीतकाराने प्रथम पदार्पणातच डोळे दिपवणारे असे यश सहज मिळवले. “दिल देके देखो’ मधील तमाम गाणी रातोरात तरुण-तरुणींच्या ओठावर रुळू लागली.
1959 साली प्रदर्शित झालेल्या शम्मी कपूर, आशा पारेख अभिनित “दिल देके देखो’ चित्रपटातील “दिल देके देखो… यार चूलबुला है… बोलो बोलो कुछ तो बोलो… बड़े है दिलके काले ओ नीली आंखोवाले… हम और तुम और ये समा… प्यारकी कसम न देखो ऐसे प्यारसे… सारखी गाणी ज्या तमाम हिंदी सिनेसंगीत रसिकांनी ऐकले तेव्हा हे संगीत उषा खन्ना नावाच्या एका नवोदित संगीतकार महिलेने दिले असेल यावर कुणाचाच अजिबात विश्वास बसला नाही. अनेक संगीतप्रेमींनी यावेळी शपथेवर, छातीठोकपणे हे संगीत ओ. पी. नय्यर यांचेच असणार असे पैजवरही सांगण्यास कमी केले नाही. याचे कारणच मुळी या चित्रपटातील गाण्यांसाठी वाद्यवृंदाची जी शैली वापरली होती ती ओ. पी. नय्यरच्या ढंगाशी शंभर टक्के मिळतीजुळती होती. काहींनी संगीतकार ओ. पी. नय्यर यांनीच टोपणनावाने संगीत दिले असावे असा अंदाज बांधला.
असो. थोडक्यात म्हणजे ओ. पी. नय्यर यांना प्रथम पदार्पणातच चॅलेज देणारी ओ.पी.च्या ढंगाची गाणी देऊन आघाडीच्या संगीतकाराचा किताब मिळवणाऱ्या या महिला संगीतकाराने हिंदी सिनेसंगीतसृष्टीत प्रवेश केला अन् बरोबर आज एकसष्ट वर्षांनंतर वयाच्या 79 व्या वर्षी महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार मिळवला हे या पुरुषप्रधान संगीतसृष्टीत “देरसे आये पर दुरुस्त आये’ नुसार कमी मोलाचे कर्तृत्व नाही.
त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1941 रोजी ग्वालियरमध्ये झाला. वडील ग्वाल्हेर संस्थानात नोकरीस होते. काव्य अन् गायकीची आवड असणारे मनोहर खन्ना काही कामानिमित्त 1946 मध्ये मुंबईस आले असता त्यांची गाठ हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रख्यात नायिका स्व. नर्गिसच्या आई जद्दनबाईशी पडली. त्यांची काव्यशास्त्राची आवड व तयारी बघून जद्दनबाई यांनी (त्यावेळी त्या हिंदीत एक प्रख्यात महिला संगीतकार म्हणून परिचित होत्या) मनोहर खन्ना यांना त्यांच्या “रोमिओ चित्रपटासाठी तीन गझल लिहायला सांगितल्या. ज्याबद्दल त्यांनी मनोहर खन्ना यांना 800 रुपये मानधन दिले. तेव्हा त्यांना ग्वाल्हेर संस्थानात दरमहा रुपये 500 पगार होता.
लहानपणापासूनच उषा खन्नाला अरेबिक संगीताची विलक्षण आवड व ओढ होती. ही आवड वा ओढ आणि अरेबिक संगीताचा व्यासंग त्यांनी संगीतबद्ध केलेल्या काही चित्रपटांतील गाण्यात डोकावतो. उषा खन्ना यांना पार्श्वगायिका बनून हिंदी सिनेसंगीतसृष्टीत करिअर करायचे होते. त्यामुळे नशीब आजमावण्यासाठी त्या मुंबईतील काही तत्कालीन प्रख्यात संगीतकार, गायक व कलाकार आदींना भेटल्या. त्यापैकीच एक होते संगीतकार ओ. पी. नय्यर. तेव्हा संगीताच्या सुवर्णमय कालखंडात ओ. पी. नय्यर हे एक टॉपचे संगीतकार होते. त्यांनी तिला फिल्मिस्तानच्या शशिधर मुखर्जी (निर्माते व भागीदार) यांना भेटावयास सांगितले. त्यांनी उषा खन्नाची टेस्ट घेतली तेव्हा त्यांनी काही स्वरचित कवितांना चाली लावून त्या गाऊन दाखवल्या. त्यांच्या आवाजापेक्षा किंवा काव्यरचनेपेक्षा एस. मुखर्जी यांना त्यांच्या संगीतातील तयारीने प्रभावित केले. कविता, गायन वगैरे बाजूला ठेवून त्यांनी उषा यांना चक्क त्यांच्या आगामी “दिल देके देखो’ या चित्रपटाचे संगीत देण्याची ऑफर दिली. अन् दिल देके देखोच्या संगीताच्या बाबतीत नंतर जो इतिहास घडला तो सर्वज्ञात आहे. दिल देके देखोच्या सुपरडुपर यशानंतर तिला फिल्मस्तानचा 1961 चा “हम हिंदुस्थानी’ चित्रपटही मिळाला आणि यातील संगीतही गाजले. छोड़ो कलकी बाते… नीली नीली घटा भिगी भिगी हवा… मांझी मेरी किस्मत जी चाहे… हम जिधर चले तो… बलमा रे मोरी लट उलझा दे… अशा एकसे एक बढकर एक सुरेल सदाबहार गाण्यांनी हम हिंदुस्थानी गाजला. त्यातील “छोडो कलकी बाते’ याला राष्ट्रभक्तीपर गीताचा दर्जा मिळाला…
1959 पासून सुरू झालेली उषा खन्नांची संगीतकार म्हणून ही घोडदौड 1980 पर्यंत वादातीत होती. या काळात त्यांनी ज्या चित्रपटांना संगीत दिले त्यातील काही चित्रपटांमध्ये त्यांनी गीतलेखन केले तर काही गाणी स्वतः गायली. याच काळात त्यांचा परिचय सिनेनिर्माते, दिग्दर्शक आणि गीतकार सावनकुमार टाक यांच्याशी झाला. त्यांच्या अनेक “स’कारी चित्रपटांना त्यांनी संगीत दिले तर सावनकुमार टाक यांनी गीतलेखन केले ज्यामध्ये प्रामुख्याने सौतन, साजन बिना सुहागन, साजनकी सहेली, हवस, डाकबंगला असे चित्रपट होते. व्यावसायिकदृष्ट्या जमलेल्या या जोडीच्या पडद्याआडच्या प्रेमाचे विवाहात रूपांतर झाले. पुढे यथावकाश ते डायव्होर्समध्येही परिवर्तित झाले.
एका दृष्टीने बघितले तर उषा खन्ना संगीतकार म्हणून सावनकुमार टाकपेक्षा सरस होती व ती त्यांच्यापेक्षा कांकणभर जास्त यशस्वीसुद्धा आहे असे म्हणावे लागेल. कारण तिचे फक्त सावनकुमार टाकबरोबरचेच चित्रपट गाजले हे विधान अज्ञानमूलक ठरेल. हम हिंदुस्थानी नंतर त्यांनी संगीत दिलेले निशान, शबनम, लाल बंगला, आओ प्यार करे, एक सपेरा एक लुटेरा, बादल, इन्साफ, दादा, फरेब, हाय मेरा दिल असे सर्व चित्रपट संगीतदृष्ट्या केवळ गाजलेच नाही तर एकापेक्षा एक सरस होते. अर्थपूर्ण गीतांना तितकीच सुरेल सुमधुर चाल हे त्यांच्या संगीताचे वैशिष्ट्य होते. ए मेरे हमसफर मुझको पहचान ले मैं वही हूँ… दिल के टुकडे टुकडे कर के चल दिये… हाये तबस्सुम रख्खा है मुहोब्बत अपने अफसाने का नाम… चांदको क्या मालूम चाहता है कोई… बरखा रानी जरा जमके बरसो… अपने लिये जिये तो क्या जिये… अशी असंख्य गाणी जी 1970 च्या दशकातील उषा खन्नांच्या संगीतशैलीची ओळख आहेत.
1980 नंतर संगीत दिलेल्या त्यांच्या यशस्वी चित्रपटात सौतन चित्रपटाचा नंबर अर्थातच सगळ्यात वरचा लागतो. त्यानंतर त्यांच्या या संगीतमय कारकिर्दीत येतात ते बिनफेरे हम तेरे, साजन की सहेली, अगर तुम ना होते, कुंवारी बहू, सनम हरजाई, सनम बेवफा, बेवफा से वफा इ. चित्रपट… जे आले नि गेले या कॅटेगिरीतले म्हणावे लागतील. त्यांचे सुरेल सुमधुर व कर्णप्रिय, अर्थपूर्ण शब्दरचना आशयघन काव्य अन् समर्पक वाद्यरचना यांचा एक सुरेख मेळ म्हणजे उषा खन्ना. गीतकार मजरुह सुलतानपुरी, हसरत जयपुरी, सावनकुमार टाक वा जावेद अन्वर सारख्या गीतकारांनी आपल्या प्रतिभासंपन्न गीतांनी उषा खन्नांच्या चालीचे सोने केलेले आढ़ळेल. पण तेव्हाच्या संगीताच्या ट्रेण्डशी श्रोत्यांना ते पटले नाही. त्यामुळे ती आधीच महिला संगीतकार असल्याने ज्या संघर्षाला धिराने तोंड देत वाटचाल करत होती त्यात ती कालबाह्य ठरत होती. मेलडीचे दिवस तर केव्हाच सरले होते. त्यामुळे 1990 नंतरच्या तिच्या संगीताला हवी तशी दाद मिळाली नाही हे वास्तव आहे.
“दिल परदेसी हो गया’ हा 2003 मध्ये प्रदर्शित झालेला त्यांनी संगीत दिलेला शेवटचा चित्रपट होय. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांतील अनेक गाणी आजही विविध भारतीसारख्या अन्य एफएम चॅनेलवर ऐकायला मिळतात. तेव्हा उद्घोषकांने सांगितल्याशिवाय कळत नाही की हे इतके सुरेल अर्थपूर्ण गाणे उषा खन्नासारख्या हिंदी सिनेसंगीतसृष्टतील एका ज्येष्ठ प्रतिभावान महिला संगीतकाराने दिले आहे. “कौन ये आया मैहफिलमें उजला मुख काली आंखे…’ आज तुमसे दूर होके ऐसा रोया मेरा प्यार… मधुबन खुशबू देता है…’ राही मिल गये राहोमें, बाते हुयी निगाहोमें… किंवा “तेरी गलियोंमें ना रखेंगे कदम…. ये तेरी सादगी, ये तेरा बांकपन…’ जिंदगी प्यारका गीत है… असो. ही गाणी हिंदी सिनेसंगीतसृष्टीतील एका महिला संगीतकाराने कंपोझ केलेली आहे हे मुद्दाम सांगावे लागते हीच शोकांतिका आहे.
त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांची संख्या शंभरच्या वर आहे. याशिवाय त्यांच्या संगीत दिग्दर्शनात काढलेले गैरफिल्मी अल्बम तसेच दूरदर्शनच्या काही मालिकांना दिलेले संगीत हे त्यांचे कर्तृत्व सांगितल्याशिवाय कोणाला कळणार. कारण त्या स्वतः ढोल वाजवणाऱ्यांपैकी नव्हती.
आपलं संगीताचं नाणं वाजवून घेण्यासाठी त्यांना पदोपदी संघर्ष करावा लागला. त्यात त्यांना अत्यंत माफक यश आलं. याची कारणेही अनेक असल्याने उत्तम दर्जेदार वैशिष्ट्यपूर्ण व सरस संगीत देवूनही त्यावेळी त्यांचा संघर्ष होता तो आघाडीचे व मधल्या फळीतले संगीतकार शंकर-जयकिशन, ओ. पी. नय्यर, सचिनदेव बर्मन, नौशाद, हेमंतकुमार एन. दत्ता, दत्ताराम, चित्रगुप्त, कल्याणजी-आनंदजी अशा जबरदस्त संगीतकाराशी. मार्केटिंगला तेव्हाही महत्त्व होते व त्यासाठी सर्व प्रकारचे भलेबुरे मार्ग अवलंबले जात होतेच. कुरघोडी, गळेकापू स्पर्धा व अन्य राजकारण गटबाजीला तोंड देत त्या संगीत देत होत्या. पण त्यांचे संगीत लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून दिग्गजही मागे नव्हते. त्यांना या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी मिळेल ते चित्रपट स्वीकारावे लागले. त्यामध्ये आल्सो रन पठडीतले होते… जद्दनबाई व सरस्वतीदेवी नंतर हिंदी सिनेसंगीतात स्वतःचे स्थान निर्माण करणारी अशी ही सुरेल आवाजाचा व कवितेचा वारसा लाभलेली उषा खन्ना त्यामुळेच कौतुकाला, आदराला व लता मंगेशकर पुरस्काराला सर्वार्थाने पात्र ठरते.
दिलीप कुकडे