बस बंद पडण्याचे वाढते प्रकार; वरिष्ठांनी नोंद घेण्याची मागणी
वाई – वाई आगाराच्या गलथान कारभारामुळे दररोज एसटीच्या गाड्या नियोजित स्थळी न पोचताच मध्येच बंद पडत असल्याने पैसे देऊनही हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन कारावा लागत असल्याने प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या गलथान कारभाराची एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी गंभीर दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी वाई तालुक्यातील प्रवाशांमधून केली जात आहे.
वाई आगाराचे व्यवस्थापक असलेले गणेश कोळी यांचे आगारातील मेकॅनिकल शाखेमधील कर्मचाऱ्यांच्यावर लक्ष नसल्याने तालुक्यासह जिल्ह्यात धावणाऱ्या वाई आगाराच्या बसेस कुठल्याही क्षणी कुठल्याही ठिकाणी बिघाड होऊन मध्येच बंद पडतात, याचा मनस्ताप होतो. त्यामुळे प्रवाशी आपल्या महत्वाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी खासगी वाहतुकीचा आधार घेताना दिसत आहे. त्यामुळे वाई आगाराचे उत्पन्न दिवसेंदिवस घटताना दिसत आहे. त्यामुळे वाई आगार कधी नव्हे तो पहिल्यांदाच तुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
वाई आगारांमध्ये जवळपास 160 बसेस असून जुन्या इंजिनच्या पेटीवर जुन्याच पत्र्याला रंगरंगोटी करून बसेस नवीन असल्याचे भासवून प्रवाशांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालू आहे. प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चालू आहे. पण या बसेस वरून देखण्या दिसत आहेत असल्याने प्रवाशांनाही बस नवीन आहे, असे वाटते. बस आपल्याला नियोजित ठिकाणी वेळेत पोचवेल असा विश्वास बाळगून प्रत्येक प्रवासी खचाखच भरलेल्या बसमध्ये देखील उभा राहून प्रवास करतो. वाई आगाराच्या काही अंतरावरच पोहोचल्यानंतर मध्येच बसमध्ये बिघाड होऊन रस्त्यातच उभी राहते, त्यावेळी प्रवाशांच्या रोषाला चालक-वाहक यांनाच सामोरे जावे लागते.
चालक आणि वाहक हतबल होऊन आपल्या डेपो मॅनेजरला फोन करून दुसरी पर्यायी बस तातडीने पाठवण्याची विनंती करतात. त्यावेळी चालक आणि वाहकांना व संतप्त प्रवाशांना अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने व पर्यायी बस मिळत नहीा. त्यामुळे प्रवासी आणि चालक, वाहक यांच्यावर हाणामारीचे अनेक प्रसंग उदभवत आहेत. या गलथान कारभाराला जबाबदार धरून वाईच्या आगार प्रमुखांवर कारवाई होईल का, असा सवाल संतप्त प्रवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केला आहे.
वाई आगारामध्ये सर्व बसेस नादुरुस्त असल्याने त्या कुठल्याही क्षणी बंद पडून प्रवाशांचे हाल करीत आहेत याची प्रत्यक्ष पाहणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने गलथान कारभार उजेडात येण्यात मदत होईल. आगारातील चालक आणि वाहकांना आगारातून नादुरुस्त गाड्या प्रवासी वाहतुकीसाठी जबरदस्ती देण्यात येतात, पण चालकांना माहीत असते की ही गाडी नादुरुस्त आहे. ती नियोजित ठिकाणी पोहोचू शकत नाही, याची खात्री असल्याने तो गाडी नेण्यास तयार होत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी जबरदस्तीने नादुरुस्त गाड्या चालकांना ताब्यात देऊन जवळपास 50 ते 55 प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. या सर्व बाबींवर त्वरित उपाय योजना करण्यात याव्यात, अशी मागणी एका संतप्त प्रवाशाने केली.