साधारणपणे 1954 ची गोष्ट असावी. माझी आई त्या काळच्या माझ्या रत्नागिरीमधल्या लहानपणात अतिशय दुर्लभ होती. मी त्या वेळेस साडेचार वर्षांचा असेन. एक तर घर सांभाळून माझ्या अंध वडिलांना त्यांच्या इंग्रजी अध्यापनात मदत करण्यात तिचा दिवसभरातला खूप वेळ निघून जात असे. त्यात माझ्यासह तीन भावंडं. भरीस भर म्हणून काय तिला आमच्या घरासाठी चाललेल्या न्यायालयीन लढाईसाठी वारंवार पुण्याला जावं लागे. त्या काळात माझी मोठी बहीण घरातील सर्व व्यवहार पाहात असे.
त्या दिवशी संध्याकाळी आई बाहेर पडण्यासाठी तयार होत होती. आधीच आईचा सहवास क्वचित मिळणारा त्यात ती बाहेर चाललेली. त्यामुळे मी तिचा हात ओढून तिच्याबरोबर चालण्याचा हट्ट धरला. ती म्हणाली, अरे, मी चाललेय भाषणाला. तुला काय कळणार त्यातलं? तू कंटाळशील. मीही हट्टाला पेटलो होतो. मी म्हटलं, मी नाही कंटाळणार. तू मला ने. आई बरं म्हणाली आणि मी तिचा हात धरून चालू लागलो. माझी आई सावरकरभक्त होती. त्या दिवशी रत्नागिरीच्या पतितपावन मंदिराच्या प्रांगणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं भाषण होतं. मला अर्थात हे काहीच माहीत नव्हतं. मी आपला आईमागोमाग चाललो होतो.
मंदिराच्या प्रांगणात बरीच गर्दी होती. अंधार पडायला लागला होता. मला आठवतंय की पटांगणात बारीक पांढरट पिवळसर वाळू होती आणि बहुधा गॅसबत्त्या लावून (कारण रत्नागिरीत निदान आमच्या भागात तरी वीज नव्हती. संध्याकाळी घरोघर कंदील पेटविले जात.) तेथील वातावरण उजळवून टाकण्यात आलं होतं. एका प्लॅटफॉर्मवजा बैठ्या स्टेजवर खुर्च्या आणि एक टेबल होतं. आणखी कोण कोण स्टेजवर होतं ते आठवत नाही पण काळी टोपी, काळा कोट आणि स्वच्छ पांढरं धोतर असा वेष परिधान केलेले सावरकर उभे राहून भाषण देत होते.
मला अर्थातच ते काय बोलत होते हे काही आठवत नाही आणि तेव्हा काही कळलंही नव्हतं. आम्ही प्रांगणातच वाळूत बसलो होतो. मात्र मी झोपलो नव्हतो. मी बहुतेक वेळ तिथल्या वाळूतच खेळत होतो. काही काळानं भाषण संपलं आणि जोरजोरात टाळ्यांचा कडकडाट झाला. तसा मला अधूनमधून टाळ्यांचा आवाज येतच होता. भाषण संपल्यावर आई लगबगीनं उठली आणि तिनं मलाही हात धरून उठवलं. तिनं मला तडक स्टेजवरच नेलं. स्टेजवर थोडीफार गर्दी होती पण आम्ही काही क्षण थांबलो. मग आम्हाला स्वातंत्र्यवीरांना भेटण्याची संधी मिळाली.
आईनं स्वातंत्र्यवीरांना नमस्कार केला आणि मलाही करायला सांगितलं. मी नमस्कार केल्यावर स्वातंत्र्यवीरांनी मला नाव विचारलं. ते मी नीट सांगितलं. त्यानंतर मात्र सावरकरांनी मला गुगलीच टाकली. मी माझ्या भाषणात काय सांगितलं?
मला काय बोलावं ते कळेच ना. मी एकवार स्वातंत्र्यवीरांकडे आणि एकवार आईकडे पाहातच राहिलो. मग आईनं हळूच मला काही तरी सांगितलं. मी तेच तोंड वर करून सावरकरांना सांगितलं. त्यांनी माझी पाठ थोपटली. तितक्यात आईनं मला एक छोटी वही दिली आणि स्वातंत्र्यवीरांकडून स्वाक्षरी घ्यायला सांगितली. मी पडत्या फळाच्या आज्ञेनं सावरकरांपुढे ती वही धरली, त्यांनीही आनंदानं त्यांची स्वाक्षरी दिली.
कित्येक वर्षे त्या वहीतील त्यांची स्वाक्षरी मी जपून ठेवली होती. मात्र, काळाच्या उदरात ती नाहीशी झाली. एक गोष्ट मात्र चांगलीच लक्षात आहे. त्यांच्या सहीतला “र’ काहीशा वेगळ्या पद्धतीनं लिहिला होता. नंतर तो प्रकार त्यांनी सुचविलेल्या भाषासुधार प्रणालीचा भाग होता हे कळलं. आता फक्त त्या प्रसंगाची आठवण मागं राहिली आहे मात्र ती अगदी ताजी राहिली आहे. हीच माझी आणि सावरकरांची पहिली आणि शेवटची भेट ठरली. आम्ही पुण्यात आल्यानंतर स्वातंत्र्यवीरांचं वास्तव्य मुंबईत असतं असं मला कळलं. माझी जीवनातली पहिली मुंबई यात्रा 1966 मध्ये झाली; पण ती मे किंवा जूनमध्ये. दुर्दैवानं 26 फेब्रुवारीलाच सावरकर हे जग सोडून गेले.
आज मागे वळून पाहताना माझ्या मनात हाच विचार येतो की मी आईकडे ने मजसी ने अशाच अर्थाची हट्टी मागणी तिच्याबरोबर जाण्यासाठी केली नसती तर ने मजसी ने हे अजरामर काव्य लिहिणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आणि माझी अविस्मरणीय भेट झाली नसती!
श्रीनिवास शारंगपाणी