मुंबई: राज्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीने सुरु झालेल्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. तपासातून जे निष्कर्ष पुढे आहे,त्यातून पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यातच राज्य सरकारवर विरोधकांकडून आरोप होताना दिसत आहेत.
यातच आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओद्वारे मिर्झापूर असो किंवा महाराष्ट्र, राजकारणात प्यादीच मरतात, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. याआधी देखील महाराष्ट्राला लागून असलेली राज्य गोवा, गुजरात कर्नाटक मध्य प्रदेश आंध्र प्रदेश इथे कोरोना वाढत नाही. कोरोनाच महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारच कोरोना वर प्रेम आहे? की स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळे बंदी आणि कोरोनाचा वापर होतो आहे, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला होता.
सचिन वाझेंचे नाव या प्रकरणात समोर आल्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. स्कोर्पिओ मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि सचिन वाझे यांना अटक या प्रकरणाचे एकमेकांशी धागेदोरे जोडलेले आहेत. सचिन वाझे प्रकरणात खुद्द विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठाकरे सरकारविरोधात गंभीर आरोप केले आहेत. भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी देखील नैतिक जबाबदारी स्विकारुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. याचदरम्यान मनसेने देखील अप्रत्यक्षरित्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.