नवी दिल्ली : मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढण्यात आल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाची एकच लाट उसळली आहे. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी या मुद्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्षातील नेत्यांनी एकजूट करत मणिपूरच्या मुद्द्यावरुन सरकारावर निशाणा साधला. तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी तर ‘पंतप्रधान मोदी कुठे आहेत?’ असा संतप्त सवाल केला.
तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी नियम 267 चा हवाला देत सर्व कामकाज स्थगित करुन केवळ मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी केली. याविषयी बोलताना ब्रायन यांनी, “मणिपूरच्या मुद्द्यावर तातडीने चर्चा करण्याची गरज आहे. त्यामुळे नियम 267 अंतर्गत इतर कोणतेही कामकाज निलंबित केले जाऊ शकते. म्हणजेच सभागृहात इतर कोणतेही कामकाज करता येणार नाही.” असे म्हटले. तसेच ब्रायन यांनी,’आम्हाला मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा करायची आहे आणि पंतप्रधान मोदी यांना मौन सोडावे लागेल.” “कोणतेही पंतप्रधान या मुद्द्यावर गप्प कसे काय राहू शकतात,” असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला.’
पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या बाहेर मणिपूर प्रकरणावर प्रतिक्रिया देत ही घटना लज्जास्पद असल्याचं म्हटलं. पण यावर विरोधकांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, “पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या बाहेर यावर प्रतिक्रिया दिली आहे हे आम्हाला अजिबात आवडलं नाही, त्यांनी संसदेत येऊन यावर प्रतिक्रिया द्यावी अशी आमची मागणी आहे.”
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राज्यसभेचे खासदार यांनी देखील या मु्द्द्यावरुन पंतप्रधान मोदी आणि सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, “मणिपूर जळत असताना, महिलांवर अत्याचार होत असताना पंतप्रधान मोदी मात्र मौन बाळगून आहेत.”