मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून जप्त करण्यात आली. या कारवाईनंतर संजय राऊत अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राऊत यांनी भाजपवर पलटवार करत भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केला. विक्रांतसाठी गोळा केलेले 58 कोटी रुपये हडप केल्याचा आरोप राऊतांनी केला.
या पार्श्वभूमीवर संजय राऊत आज दिल्लीहून मुंबईत दाखल झाले. त्यावेळी मुंबई विमानतळावर शिवसेना आमदार सुनील प्रभू, आमदार सुनील राऊत यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी राऊतांचं जंगी स्वागत केलं. यावेळी ढोल ताशाच्या गजर आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राऊतांच्या या स्वागतावरुन आता भाजप नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात येतेय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटरद्वारे राऊतांवर जोरदार निशाणा साधत कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? असा खोचक सवाल केला आहे.
संजय राऊत यांचं मुंबई विमानतळावर शिवसैनिकांनी जंगी स्वागत केलं. या स्वागतावरुन नारायण राणे यांनी राऊत आणि शिवसेनेवर खोचक टीका केलीय. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? काळा पैसा मिळवायचाय, अन् कारवाई झाली की बोंबलायचं.. त्यानंतर केलेली पापं झाकण्यासाठी शक्ती प्रदर्शन करायचं. यातून जनतेने काय बोध घ्यावा? संजय राऊत यांचे लक्ष पक्षप्रमुख पदावर की मुख्यमंत्री पदावर? असं ट्वीट नारायण राणेंनी केले आहे.