कोलकता – पीएम केअर्स फंड हा सरकारी निधी नसल्याची भूमिका घेणाऱ्या मोदी सरकारवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. त्या फंडातील प्रचंड पैसा गेला कुठे, असा सवालही ममतांनी केला.
करोना संकटकाळात विविध उपाययोजनांसाठी आर्थिक तरतूद करण्याच्या उद्देशातून मोदी सरकारने पीएम केअर्स फंड उभारला. मात्र, तो निधी सरकारी नसल्याचे सरकारकडून गुरूवारी दिल्ली उच्च न्यायालयात सांगण्यात आले. त्या भूमिकेवर विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. आता ममतांनीही त्यावरून मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्री मदत निधीचे नियमितपणे लेखापरीक्षण होते.
पीएम केअर्स फंडाबाबत पूर्ण पारदर्शकता ठेवण्याची गरज आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसह अनेकांनी त्या फंडासाठी योगदान दिले आहे. त्या फंडावर राष्ट्रचिन्ह वापरण्यात आले आहे. त्यामुळे तो फंड सरकारी निधी नसल्याची भूमिका सगळ्यांनाच चकित करणारी आहे, असे ममतांनी म्हटले आहे.