नवी दिल्ली – लडाखमधील गलवान खोऱ्यात मागील वर्षी झालेल्या धुमश्चक्रीचे खापर पुन्हा भारतावर फोडण्याचा प्रयत्न चीनने नव्याने केला. मात्र, भारताने परखड भाषेत कुरापतखोर चीनचा दावा फेटाळून लावला. तसेच, चीनच्या चिथावणीखोर वर्तणुकीमुळे शांतताभंगाची गंभीर घटना घडल्याचे अधोरेखित केले.
चीनी कुरापतींमुळे मागील वर्षीच्या मेपासून पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) म्हणजेच सीमेच्या लगत तणावाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर पुढच्याच महिन्यात (15 जून) भारतीय जवान आणि चीनी सैनिक आमनेसामने येऊन त्यांच्यात धुमश्चक्री झाली. त्यामध्ये दोन्ही बाजूंची जीवितहानी झाली. आता सीमेवरील तणाव निवळला असला तरी पूर्ण संपुष्टात आलेला नाही. अशातच चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी शुक्रवारी भारतविरोधी कांगावा केला.
भारताने द्विपक्षीय करारांचा भंग करून चीनच्या हद्दीत शिरकाव केला. त्यामुळे गलवान खोऱ्यात धुमश्चक्री झाली, असे ते म्हणाले. चीनचा तो खोटा दावा तातडीने खोडून काढणारी प्रतिक्रिया भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली. पूर्व लडाखमधील जैसे थे स्थिती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न चीनने केला. त्या चिथावणीखोर कृतीमुळे तेथील शांततेला तडा गेला. चीनी कुरापतींमुळे द्विपक्षीय संबंधांवर परिणाम झाला, अशी भारताची सातत्यपूर्ण आणि ठाम भूमिका त्यांनी मांडली.