पवनानगर, (वार्ताहर) – मावळ तालुका निसर्ग सौंदर्य नटलेला तालुका आहे. मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगर भाग असून तेथे मोठ्या प्रमाणावर प्राणी, पक्षी यांचा वावर आहे. गेल्या १५ दिवसांपासून मावळ तालुक्यात शिकारीचे प्रमाण वाढले आहे. पंरतु, वनविभागचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. मावळ तालुक्यातील महागांव येथे गेल्या आठवड्यात एक कुत्रा, वाऊंड येथे तरस जातीच्या प्राण्याची शिकाऱ्याच्या फास्यात अडकलेल्या अवस्थेत मिळाले.
तर लोहगड येथे शिकाऱ्यांनी ठेवलेल्या स्फोटक पदार्थामुळे गाईच्या तोंडाला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील शिकारी थांबणार कधी? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
मावळ तालुक्यातील भागात मोठी वनराई, जंगले आहेत. येथे मोठ्या प्रमाणात वनविभागाचे क्षेत्र आहे. वन्य प्राण्यांची शिकार करण्यास बंदी असताना देखील वनविभागाच्या हद्दीत प्राण्याची शिकार होत आहे. पवनमावळ, आंदरमावळ व नाणेमावळ यासह अती दुर्गम भागात गेल्या काही वर्षांपासून वन्यप्राण्याच्या शिकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
बंदुकीने, विशिष्ट स्फोटकाने अथवा इतर मार्गाने शिकार होत आहेत. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. वाढत्या शिकारीमुळे वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आले आहे. मुंबई, पुणे शहरातील प्रतिष्ठित बंदुकधारी शिकारीसाठी मावळला पसंती देत असून यामध्ये अनेकांचे वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याशी लांगेबंदी असल्याचे वन्य प्राणी मित्रंकडून तक्रार होत आहे. या सर्वांमध्ये वन्य प्राण्यांचे जीवन धोक्यात आले असल्याचे चित्र दिसत आहे.