आयपीएल स्पर्धा सुरू झाली की एखादा कोणीतरी खेळाडू असा काही खेळतो की वाटते अरे याला तर भारतीय संघातच थेट स्थान दिले गेले पाहीजे. मात्र, हा पाण्यावरचा बुडबुडा असतो हे काही दिवसांतच लक्षात येते. त्यामुळे आता या स्पर्धेतून यापुढील काळात सिझनल फळांची गरज नाही तर भक्कम सेकंड बेंचची गरज आहे.
शिवम मावी, उमरान मलिक, शिवम दुबे, व्यंकटेश अय्यर, राहुल तेवतिया हे आणि असे कितीतरी खेळाडू या स्पर्धेतून पुढे आले; पण दर्जा काय होता ते आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गेल्यावर लक्षात आले की हे हिरे नसून केवळ काचेचे तुकडे आहेत व त्याला कितीही पैलू पाडले तरीही त्याचा हिरा होऊ शकत नाही.
बीसीसीआय व निवड समिती यांनी एकत्रितपणे बसून देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील मर्यादित षटकांच्या ज्या स्पर्धा होतात त्यावर जास्त गांभीर्याने लक्ष दिले पाहीजे. केवळ आयपीएल स्पर्धा हाच टी-20 व एकदिवसीय संघाच्या निवडीचा निकष असू नये. पूर्वी रणजी करंडक स्पर्धेत आपला दर्जा सिद्ध केला की भारताच्या संघात स्थान मिळायचे आता तो काळ गेला व आयपीएलद्वारे फास्टफुडचा जमाना आला.
जे सुनील गावसकर स्वतः एखाद्या नवोदित फलंदाजाने षटकार मारला तर संतप्त होत होते, तेच आता व्हॉट ए शॉट असे जोरात ओरडतात ही आयपीएलची किमया आहे की त्याच्या समालोचनातून मिळत असलेल्या लक्ष्मीची. तंत्र बदलले हे समजू शकतो पण निकष कसा काय बदलू शकतो.
एक फलंदाज देशाकडून खेळत असताना 360 डीग्रीमध्ये फलंदाजी करत असल्याचे कौतुक मानायचे की कीव करायची हेच आथा समजेनासे झाले आहे. या मुशीतून कसोटीपटू कसे काय घडणार आहेत. आणी आपण चाललो आहोत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्यासाठी. या संघातील अर्धे फलंदाज आयपीएलवर पोसले गेले आहेत. संघात परिपूर्ण कसोटी फलंदाज आहेतच कीती.
चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, अर्धा विराट कोहली व अर्धा रोहित शर्मा. म्हणजे केवळ चार फलंदाजांवर आपण ऑस्ट्रेलियाला भिडणार आहोत. गेल्या वर्षी न्यूझीलंडसमोर जे घडले तेच घडणार हे स्पष्ट दिसत आहे. कारण कसोटी क्रिकेट भारतीय क्रिकेटपटूंनाच नकोसे झाले आहे मग निकाल सामन्यापूर्वीच लागलेला असणार. प्रत्येक आयपीएल स्पर्धेतून काही नवे चेहरे समोर येतात व जीतक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने गायबही होतात. त्यामुळे असा काहीतरी उपाय केला गेला पाहीजे की सिझनल फळांच्या जागी भक्कम सेकंड बेंच मिळावा.