सांगवीत झाडांची कत्तल : स्मार्ट सिटीच्या नावाखाली रस्त्याच्या कामासाठी अवैध वृक्षतोड
पिंपरी/ पिंपळे गुरव – स्मार्ट सिटीच्या बहाण्याने शहरातील विविध भागांत सर्रास झाडांची कत्तल होत आहे. कामे करणाऱ्या ठेकेदारांकडून औपचारिकता म्हणून उद्यान विभागाकडून परवानगी घेतली जाते. मात्र, घेतलेल्या परवानगीनुसार वृक्षतोड न करता अवैधरित्या वृक्षतोड केली जात आहे. नुकतीच सांगवी परिसरात बॅंक ऑफ महाराष्ट्र ते माकन हॉस्पिटल चौकापर्यंत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेल्या देशी आणि जुन्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे.
यावर नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर आता उद्यान विभाग ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगत आहे. मात्र, झाडे जिवानीशी गेली, तेव्हा प्रशासनाला जाग आली असल्याच्या तक्रारी पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांनी केल्या आहेत. तर, याबाबत एक झाड अवैधरित्या तोडले असल्याचे उद्यान विभागाने सांगितले आहे. आता यावर उद्यान विभाग काय कारवाई करणार हे बघणे महत्त्वाचे आहे.
सांगवीत रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. अधिकृत परवानगी उद्यान विभागाकडून घेण्यात आल्याचा दावा संबंधितांकडून केला जात आहे. मात्र, उद्यान विभागाने संबंधिताने बकुळ 2, रेनट्री 1, बहावा 6, कडुलिंब 2, कांचन 1, उंबर 3 आणि पिंपळ 1 वृक्षांची कत्तल केली आहे. यातील बकुळ, रेनट्री, बहावा, कडुलिंब, कांचन या झाडांची विकासात काही अडचण येत असेल तर काढण्याची परवानी मिळते. परंतु उंबर आणि पिंपळ या वृक्षांचे पुनर्रोपण करावे लागते. या वृक्षांचे पुनर्रोपण करण्याच्या सूचना उद्यान विभागाने केल्या होत्या. मात्र, त्यांनी दोन वृक्षांचे पुनर्रोपण करून एक वृक्ष मुळासकट तोडून टाकला. काही झाडांची अवैधरित्या कत्तल झाल्याची शंका स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
उद्यान विभागाकडे चौकशी केली असता याबाबत परवानगीनुसार येथील तीन झाडांपैकी एका झाडाचे पुनर्रोपण न करता झाडाला मुळापासून तोडण्यात आले आहे. याबाबत चौकशी करून कायदेशीररित्या संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येणार असल्याचे उद्यान विभागाचे वृक्ष अधीक्षक प्रकाश गायकवाड यांनी सांगितले.
उद्यान विभागाने संबंधित ठेकेदाराला वृक्षतोड व वृक्ष पुनर्रोपण करण्याची परवानगी दिली होती. परंतु त्यांनी झाडांची कत्तल केली आहे. त्यामुळे उद्यान विभागाला लेखी निवेदन देऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी मनसेच्या राजू सावळे यांनी केली.