पुणे- केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजना बंद करण्याचा निर्णय घेतल्याने या योजने अंतर्गत पुणे स्मार्ट सिटी काॅर्पोरेशन लिमिटेड ( पीएससीडीएल) अंतर्गत गेल्या आठ वर्षांत उभारण्यात आलेले सुमारे १४ प्रकल्प पुढील २० दिवसांत महापालिकेस हस्तांतरीत केले जाणार आहेत.
महापालिकेत मंगळवारी या प्रकल्पांबाबत बैठक झाली. यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले. स्मार्ट सिटीचे आणखी काही प्रकल्प पूर्ण होत असून त्यासाठी स्मार्ट सिटीला ५८ कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. हा निधी देण्यासाठी महापालिकेने पैसे नसल्याचे कारण दिल्याने स्मार्ट सिटीकडून त्यासाठी राज्यशासनाकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
२४ प्रकल्पांचे हस्तांतरण
स्मार्ट सिटीकडून एरिया डेव्हलपमेंट अंतर्गत बाणेर-बालेवाडी भागाची निवड करण्यात आली. त्यानुसार, सुमारे तीन चौरस किलोमीटर क्षेत्रात वेगवेगळे प्रकल्प उभारण्यात आले. काही प्रकल्प संपूर्ण शहरासाठी आहेत. यामध्ये सिंहगड रस्त्यावरील कमांड आणि कंट्रोल सेंटर, वाहतूक नियोजनासाठी अत्याधुनिक सिग्नल यंत्रणा तसेच काही उद्यानांचा समावेश आहे.
यातील काही प्रकल्प महापालिकेस हस्तांतरण करण्यात आले असून उर्वरीत १४ प्रकल्प पुढील २० दिवसांत हस्तांतरीत केले जाणार आहे, काही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालिकेकडे दिले जाणार आहेत. यामध्ये उद्याने, जलतरण तलाव, नागरी सुविधा अशा वेगवेगळ्या प्रकल्पांचा समावेश असून निविदा काढून हे प्रकल्प महापालिका चालविण्यास देणार आहे.
५८ कोटींचा तिढा ?
स्मार्ट सिटीकडून बाणेर-बालेवाडी भागात उभारण्यात येणार्या प्रकल्पासाठी अंदाजपत्रक तयार केले होते. त्यासाठी केंद्रशासन, राज्यशासन व महापालिका असे भांडवल देणार होती. त्यामुळे केंद्रशासन व राज्याकडून आलेला निधी स्मार्ट सिटीने बॅकेत ठेवला होता. मात्र, प्रकल्प न करता हा निधी खर्ची न पडल्याने केंद्रशासनाने या बॅक़ेत ठेवलेल्या निधीचे व्याज स्मार्ट सिटीकडून काढून घेतले. त्यामुळे, कामे अंतीम टप्प्यात असलेल्या स्मार्ट सिटीला उर्वरीत प्रकल्पांसाठी ५८ कोटींच्या निधीची आवश्यकता असून हा निधी महापालिकेकडे मागण्यात आला होता. मात्र, महापालिकेनेही निधी देण्यास हात वर केल्याने अखेर राज्य शासनाकडे या निधीची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे हा निधी कोणी द्यायचा हा तिढा कायम असून याचा भार पुणेकरांवर येण्याची शक्यता आहे.
असा राहिला स्मार्ट सिटीचा प्रवास
केंद्र शासनाने २०१५ मध्ये स्मार्ट सिटी स्पर्धेची घोषणा केली होती. यासाठी देशातील एक लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ९८ शहरांची निवड स्पर्धा घेऊन करण्यात आली. यात पुणे महापालिकेला दुसरा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर देशातील या स्मार्ट सिटीचा शुभारंभ २०१६ मध्ये पुण्यातील बालेवाडी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मागील वर्षी केंद्राने ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला. या स्पर्धेत पुणे महापालिकेने क्षेत्र विकासासाठी बाणेर- बालेवाडी या भागाची निवड केली होती.