सोमाटणे, (वार्ताहर) – सांगवडे येथील पूल धोकादायक झाला आहे. किरकोळ डागडुजी केल्यानंतर धोकादायक असलेल्या सांगवडे पुलावरून पुन्हा चारचाकी वाहतूक सुरू झाली आहे.
काही दिवसांपूर्वी केवळ पादचारी व दुचाकीसाठी असलेल्या व अगोदरच कमकुवत झालेल्या सांगवडे पुलावरून कार गेल्याने पुलाचे लोखंडी खांब दबले गेले होते. पुलावरील स्लॅबला तडा जाऊन तो उखडला होता. या घटनेनंतर सांगवडे ग्रामपंचायतीने वाहतुकीसाठी हा पूल बंद केला होता. दरम्यानच्या काळात उखडलेल्या स्लॅबची किरकोळ डागडुजी करून फक्त पादचारी, सायकल व दुचाकीसाठी तो सुरू करण्यात आला होता.
जिल्हा परिषद बांधकाम विभागानेही धोक्याचा इशारा देणारा फलक लावला आहे. याचाही विचार न करता काही न ऐकणाऱ्या तरुणांनी पुन्हा या पुलावरून चारचाकी वाहतूक सुरू केली आहे. यातून मोठा धोका होण्याची शक्यता असल्याने या पुलावरून जड चारचाकी वाहने नेऊ नये, असे ग्रामस्थांनी यांनी केले आहे.