नांदेड – रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी 2000 रुपयांच्या गुलाबी नोटांवर मोठा निर्णय घेतला आणि त्या चलनातून बाद करण्याची घोषणा केली. त्यामुळे नागरिकांना 30 सप्टेंबरपूर्वी 2 हजार रुपयाची नोट बँकेत जमा करावी लागणार आहे.या निर्णयानंतर अनेकांनी सरकारवर टीका केली. कारण या आधी 2016 मध्ये नोटबंदी करण्यात आली होती. ज्याचा परिणाम सामान्य जनतेवर मोठ्या प्रमाणात झाला होता.
याप्रकरणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपने याआधी केलेल्या नोट बंदीत काय निघालं जे आत्ता परत हेच करण्यासाठी निघाले? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “हे फक्त आता निवडणुका जवळ येत आहेत म्हणून सुरू आहे. याचा अर्थ व्यवस्थेवर खूप वाईट परिणाम होईल ज्यामुळे बदल होतील. तुम्हीच दोन हजराच्या नोटा आणल्यात आणि परत तुम्हीच त्या रद्द करत आहात. या नोटा सगळ्यात जास्त कोणाकडे आहे हे सगळ्यांना माहित आहे.”
पुढे ते म्हणाले, “निवडणूका जवळ आल्याने याचे वेगवेगळे अर्थ निघतील. नोट बंदीमुळे मोठा व्यक्ती मोठा झाला लहान माणूस लहान झाला. यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होणार आहे.” नोट बंदी करून काय बाहेर येणार आहे हे माहित नसल्याचा टोलाही आव्हाडांनी यावेळी लगावला आहे.
दरम्यान, 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत चलनात राहतील. म्हणजेच ज्यांच्याकडे सध्या 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांना त्या बँकेतून बदलून घ्याव्या लागतील. त्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच बँका आता ग्राहकांना 2000 च्या नव्या नोटा देणार नाहीत.